अकाली दलाचे ज्येष्ठ नेते नरेश गुजराल यांचा दावा
नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रात एनडीएचे सरकार स्थापन होईल, असा दावा अकाली दलाचे ज्येष्ठ नेते नरेश गुजराल यांनी केला आहे. मात्र, या निवडणुकीत भाजपला स्वबळावर बहुमताचा आकडा गाठता येणार नाही, अशी शक्यता त्यांनी वर्तवली.
मित्रपक्षांच्या मदतीने एनडीएचेच सरकार स्थापन होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, सहकारी, मित्रपक्षांना एकत्र घेत सरकार चालवण्याचा अनुभव भाजपला आहे. असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच भाजपच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून केले आहे. त्यामुळे एनडीएचीच चर्चा जोरदार सुरू आहे.
2014 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकांपेक्षा ही निवडणूक वेगळी आहे. 2014 मध्ये मोदी लाट होती. या निवडणुकीत कोणतीही लाट नसून मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगडसह इतर राज्यातही राजकीय समीकरणे बदलली आहेत.
मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगडमध्ये कॉंग्रेसचे सरकार स्थापन झाले आहे. तेथे भाजपचा जनाधार घटला आहे.
तसेच सपा-बसपा आघाडीने भाजपसमोर मोठे आव्हान उभे केले आहे. या सर्व गोष्टींचा विचार करता भाजप स्वबळावर बहुमताचा 272 चा आकडा गाठू शकणार नाही, मात्र, केंद्रात एनडीएचेच सरकार स्थापन होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. निवडणुकीनंतर केंद्रात भाजप सहकारी पक्षांच्या सहकार्याने सरकार स्थापन करेल. असा विश्वास भाजपचे सरचिटणीस राम माधव यांनी व्यक्त केला होता.अकाली दलाला पंजाबमध्ये जास्त जागा मिळतील, असा दावाही गुजराल यांनी केला.