पाटणा – एका बॅंकेच्या चुकीमुळे बिहारमधील एका ग्रामस्थाच्या खात्यात तब्बल साडेपाच लाख रूपये जमा झाले. मात्र, ती रक्कम परत करण्यास ग्रामस्थाने टाळाटाळ केली. ते पैसे म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून मिळालेली गिफ्ट असल्याची भूमिका ग्रामस्थाने लावून धरली. मात्र, त्या कथित गिफ्टने संबंधित ग्रामस्थाची रवानगी तुरूंगात केली.
बिहारच्या खगडिया जिल्ह्यातील एका गावचा रहिवासी असणाऱ्या रणजीत दास याच्या बॅंक खात्यात अचानकपणे भलीमोठी रक्कम जमा झाली. ती रक्कम काढून दासने खर्च करण्यासही सुरूवात केली. चूक ध्यानात आल्यावर बॅंकेने रक्कम परत करण्याचा लकडा दासकडे लावला. मात्र, त्याने संबंधित रक्कम म्हणजे मोदींकडून आलेली गिफ्ट असल्याची भूमिका कायम ठेवली.
अखेर बॅंकेने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करत दासला अटक केली. अटकेनंतर त्याची रवानगी तुरूंगात झाली. पंतप्रधान बनण्याआधी मोदी यांनी 2014 मधील लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात काळ्या पैशांचा मुद्दा आक्रमकपणे मांडला. परदेशी बॅंकांत ठेवलेला काळा पैसा परत आणल्यास प्रत्येक भारतीयाच्या बॅंक खात्यात 15 लाख रूपये जमा होऊ शकतात, अशी भूमिका मोदी मांडायचे. ते त्यांनी दिलेले आश्वासनच आहे, असा समज अजूनही अनेकांनी करून घेतलेला दिसतो.