नवी दिल्ली – कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल करत म्हटले की, देशातील मोठ्या अपयशावरून लोकांचे लक्ष अन्यत्र विचलीत करण्यासाठी पंतप्रधान मोदींकडून पुन्हा वेगळे विषय पुढे करण्याची आखणी सुरू आहे.
तथापि असे असले तरी बेरोजगारीचा विक्रमी दर, घाऊक किंमतीच्या महागाईचा गेल्या 30 वर्षातील उच्चांक, एलआयसीचे 17 अब्ज डॉलर्सचे अवमुल्यन अशा समस्यांचे अपयश ते लपवू शकणार नाहीत असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
त्यांनी म्हटले आहे की भारतीयांपुढे अनेक गंभीर समस्या निर्माण झाल्या असताना लोकांचे लक्ष अन्यत्र विचलीत करण्यासाठी नवीन उपाययोजना करण्यासाठी मोदींचे सध्या नियोजन सुरू आहे. मोदी सरकारच्या अर्थ व्यवस्था हाताळणीतील अपयशावर राहुल गांधी यांनी जोरदार टीका करताना त्यांना देशात रोजगाराच्या संधी वाढवण्याकडे लक्ष देण्याचे आवाहन केंद्र सरकारला केले आहे.