आग्रा – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजवटीत भारताची विभागणी झाली असून दोन प्रकारचे लोक तयार करण्यात आले असल्याचा आरोप कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी काल केरळच्या एर्नाकुलम जिल्ह्यात केला होता. त्यावर आज योगगुरू रामदेव बाबा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मोदींनी भारताची विभागणी केलेली नाही. भारत अगोदरच एससंध असल्यामुळे भारत कोणी जोडूही शकत नाही असे त्यांनी म्हटले आहे.
काय म्हणाले राहुल गांधी –
आपल्या भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल म्हणाले की, मोदी यांच्या काळात दोन प्रकारचा भारत तयार झाला आहे. एक भारत मोजक्या अब्जाधीशांचा आहे. भारतातील सर्व उद्योग त्यांच्या ताब्यात आहेत व त्यांची स्वप्ने ते सहज पूर्ण करू शकतात. तर दुसरा भारत लाखो कामगार, शेतकरी, चहावाले, आयटीवाले, छोटे व्यावसायिक यांचा आहे.
यातील कोणीही आपली स्वप्ने पूर्ण करू शकत नाहीत. राहुल यांच्या या आरोपांवर रामदेव बाबा म्हणाले की, मोदींनी असे काहीही केलेले नाही. कोणी एक व्यक्ती भारत जोडू शकत नाही. शिवाय भारत जोडणे म्हणजे भारत तोडला गेला असा त्याचा अर्थ होतो व तसे म्हणणे चुकीचे आहे कारण भारत एकच आहे.