मुंबई – काही दिवसांपूर्वीच रोशनलाल हे काश्मीरी पंडित तब्बल २९ वर्षानंतर पुन्हा काश्मीरात परतले आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेनेने आज आपले मुखपत्र सामना संपादकीयमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत. रोशनलाल यांच्या पावलावर पाऊल ठेवून हजारो कश्मिरी पंडित घरवापसी करतील, असा विश्वास यावेळी शिवसेनेने व्यक्त केला. सोबतच मोदी है तो सबकुछ मुमकीन हैं, असेही म्हंटले आहे.
काश्मीर खोर्यांत एकही हिंदू राहता कामा नये व कुणी राहिलाच तर त्यास खत्म करायचे ही पाकिस्तानची योजना होती. त्यातूनच असंख्य पंडितांचे शिरकाण करण्यात आले. उरलेल्यांना तिथून विस्थापित होण्याशिवाय पर्याय राहिला नाही. त्यातील एक रोशनलाल आता तब्बल २९ वर्षांनंतर काश्मीरमध्ये परतले आहेत. मानवाने चंद्रावर पहिले पाऊल ठेवले त्याप्रमाणे रोशनलाल यांनी काश्मीरच्या भूमीवर पहिले पाऊल ठेवले. आता एक पाऊलवाट तयार होईल. काश्मीरात गुलाबाचे ताटवे पुन्हा फुलतील. ‘हिंदुस्थान झिंदाबाद’चे नारे घुमतील. मोदी यांनी देशाच्या धमन्यांत जे स्फुल्लिंग चेतवले त्याचेच हे दृष्य फळ दिसू लागले आहे. मोदी है तो सबकुछ मुमकीन हैं। रोशनलाल यांच्या काश्मीर प्रवेशाने ते पुन्हा सिद्ध झाले. रोशनलाल यांना शुभेच्छा! मोदी यांना भगवा सलाम, असे शिवसेनेने सामानात म्हंटले आहे.