नवी दिल्ली : लष्कर तैनात करून आणि मोबाईल, इंटरनेट सेवा बंद करून केंद्र सरकार काश्मिरचा प्रयोग ईशान्य भारतात करत असल्याचा आरोप कॉंग्रेसने गुरूवारी केला.
कॉंग्रेस नेते अधिर रंजन चौधरी यांनी शुन्य प्रहरात लोकसभेत हा मुद्दा उपस्थित केला. लष्कर तैनात केल्यानंतर आणि अनिश्चित काळासाठी संचारबंदी जारी केल्याच्या दुसऱ्या दिवशी हा मुद्दा संसदेत उपस्थित केला. नागरिकत्व सुधारणा विधेयक (कॅब) मंजूर केल्यानंतर मंगळवारी आणि बुधवारी आसाम आणि त्रिपुरात हिंसाचार उफाळला. त्यानंतर तेथे आसाम रायफल्स तैनात करण्यात आले आहे.
संसदेत कॅब मंजूर झाल्यानंतर संपूर्ण ईशान्य भारत पेटून उठला आहे. यापुर्वीच येथे लष्कर तैनात करण्यात आले आहे. इंटरनेट सेवा खंडित करण्यात आली आहे. काश्मिरसारखीच पध्दत तेथे वापरण्यात येत आहे, असे चौधरी यांनी सांगितले. ते म्हणाले, केंद्र सरकारमुळेच काश्मिरातील जनजीवन सुरळीत होत नाही. आता ईशान्य भारत त्या दिशेने वाटचाल करत आहे. भारत सरकार जे काही करत आहे ते बरे नाही. लाखो हिंदु बांगलादेशात सुखाने रहात आहेत.
या वक्तव्यावर लोकसभा अध्यक्षांनी त्यांना रोखले. बांगलादेश आणि इंग्लंड भारताची संसद चालवत नाहीत. ही भारतीय संसद आहे. भारतीय घटनेच्या कायद्यानुसार तिचे काम चालते. त्याला अन्य कोणत्या देशाने शिकवण्याची गरज नाही. दरम्यान चौधरी म्हणाले, बांगलादेशशी असणारे संबंध बिघडवून चालणार नाही. त्याचा फायदा पाकिस्तान आणि चीन घेईल. याकडे मला सरकारचे लक्ष वेधायचे आहे. चौधरी यांच्या या वक्तव्यावर सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी जोरदार आक्षेप घेतला. त्यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली. संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सरकारविरोधात कॉंग्रेस ईशान्य भारतात हिंसाचार घडवत असल्याचा आरोप केला.