नवी दिल्ली – मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्म मधील हे पहिले वर्ष म्हणजे, निराशा, यातना आणि भीषण गैरव्यवस्थेचे वर्ष होते अशी टीका कॉंग्रेस पक्षाने केली आहे. पक्षाचे नेते के.सी. वेणुगोपाल यांनी सांगितले की, मोदी सरकारच्या सहा वर्षाच्या काळात बुंधभाव, सद्भभावनेचे वातावरण नष्ट झाले आणि देशात अनेक ठिकाणी धार्मिक द्वेष आणि त्यातून मोठ्या प्रमाणात हिंसाचाराची नोंद झाली.
कॉंग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला म्हणाले की, गेल्या सहा वर्षाचा मोदींचा कारभार पाहिल्यानंतर हे सरकार आपल्याच जनतेच्या विरोधात युद्ध करीत असल्यासारखे भासत असून त्यांनी लोकांना अनेक जखमा दिल्या आहेत. वास्तविक जनतेच्या जखमांवर फुंकर घालण्याचे काम सरकारने करावे, अशी अपेक्षा असते; पण या सरकारच्या काळात जनताच अधिक भरडली गेली आहे. गरीबांना अडचणीत टाकून हे सरकार काही मोजक्याच धनिकांच्या तिजोऱ्या भरण्याचे काम करत आहे.
वेणुगोपाल म्हणाले की करोनाच्या काळात आम्हीं राजकारण करीत असल्याचा भाजपचा आरोप बिनबुडाचा आहे. लोकहिताच्यादृष्टीने आम्ही सरकारला काही महत्वाच्या सूचना वेळोवेळी करीत आलो आहोत याला राजकारण म्हणता येणार नाही. हे सरकार स्थलांतरीत मजूर आणि शेतकऱ्यांच्या बाबतीत पूर्ण असंवेदनशील सरकार आहे. देशापुढील समस्यांवर चर्चा करण्यासाठी सरकारने त्वरित संसदेचे अधिवेशन बोलावावे, अशी मागणी सुर्जेवाला यांनी केली. विविध संसदीय समित्यांचेहीं काम आता सरकारने सुरू केले पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली.