नवी दिल्ली – मोदी सरकारची दुसरी टर्म सुरु होऊन १० दिवसच झाले असताना अर्थमंत्रालयाने भ्रष्ट अधिकाऱ्यांवर सर्जिकल स्ट्राईक केले आहे. भ्रष्टाचार, बेहिशेबी मालमत्तेचे आरोप असलेल्या १२ अधिकाऱ्यांना सक्तीची निवृत्ती दिली आहे. देशात पहिल्यांदाच एवढी मोठी कारवाई झाल्याचे मानले जात आहे.
मोदी सरकारनं भ्रष्टाचारमुक्त भारताचा नारा दिला आहे. त्यानुसार अर्थमंत्रालयाने नियम ५६च्या अंतर्गत १२ अधिकाऱ्यांना सक्तीची निवृत्ती घ्यायला लावली आहे. या कारवाईमुळे आयकर विभागातील अधिकाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहे. अशी कारवाई भविष्यात इतर विभागांवरही होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कोण आहेत अधिकारी
या १२ अधिकाऱ्यांमध्ये अशोक अग्रवाल (IRS १९८५), एस. के. श्रीवास्तव (IRS १९८९), होमी राजवंश (IRS १९८५), बीबी राजेंद्र प्रसाद, अजॉय कुमार सिंह, बी. अरुलप्पा, आलोक कुमार मित्रा, चांदर सेन भारती, अंडासु रवींद्र, विवेक बत्रा, स्वेताभ सुमन आणि राम कुमार भार्गव यांचा समावेश आहे. या अधिकाऱ्यांमधील अशोक अग्रवाल हे ईडीमध्ये कार्यरत होते. त्यांच्याविरुद्ध अनेक खटले दाखल आहेत.