नवी दिल्ली – देशात आधीच रोजगार निर्मीतीचे प्रमाण कमी झालेले असतानाच ऑटोमोबाईल क्षेत्रातील दहा लाख लोकांच्या रोजगारावर टांगती तलवार निर्माण झाली असल्याचे जे वृत्त प्रसारीत झाले आहे त्या अनुषंगाने कॉंग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली आहे. या बातम्यांची कात्रणे ट्विट करून त्यांनी म्हटले आहे की रोजगाराचे सध्या जे प्रमाण कमी होत आहे त्यावरील मोदी सरकारचे मौन अधिक धोकादायक आहे.
औद्योगिक क्षेत्रातील एसीएमए या संस्थेने बुधवारी एक अहवाल प्रसारीत केला आहे त्यात त्यांनी म्हटले आहे की वाहन उद्योग क्षेत्रातील कमालीच्या मंदीच्या स्थितीने या क्षेत्रातील दहा लाख रोजगार गमावण्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्याचा संदर्भ देऊन प्रियांकांनी म्हटले आहे की या क्षेत्रातून रोजगार गमावणाऱ्यांना आता पर्यायी रोजगाराची गरज निर्माण होणार आहे. त्यासाठी सरकारकडून प्रयत्न होणे अपेक्षित असताना हे सरकार मात्र सोयीस्कर मौन पाळून गप्प आहे.