ठाणे – माजी मुख्यमंत्री आणि भाजप खासदार नारायण राणे यांनी राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीवर कडाडून टीका केली. तसेच केंद्र सरकारने मांडलेल्या अर्थसंकल्पावर राणे यांनी आपली भूमिका व्यक्त करत अर्थसंकल्पाचे विश्लेषण केले आहे. ते माध्यमांशी बोलत होते.
केंद्रीय अर्थमंत्री निर्माला सीतारामन यांनी मांडलेला अर्थसंकल्प धाडसाचा आणि सर्वसामान्यांना न्याय देणार आहे. देशाला आत्मनिर्भर बनवून देशाला महासत्ता बनवणारा अर्थसंकल्प मोदी सरकारने बनवला आहे. हा अर्थसंकल्प जाणून न घेता विरोधक टीका करत आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना अर्थसंकल्प समजतो की, नाही कुणास ठावूक असा टोलाही राणे यांनी लगावला.
देशाचा अर्थसंकल्प ३४ लक्ष ८३ हजार कोटींचा आहे. एवढा मोठा अर्थसंकल्प काँग्रेसच्या राजवटीत कधीही मांडला गेला नाही. आमच्या सरकारचा अर्थसंकल्प भांडवली खर्चामध्ये तब्बल ३४.५ टक्के ग्रोथचा आहे. करोनानंतर अनेक देशांना बजेट सादर करता आला नाही. परंतु, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात हे शक्य झालं आहे. यासाठी पंतप्रधान मोदींचे कौतुक केलं जात आहे. त्यामुळे आपलं बजेट देशाला महासत्ता बनवणारे असल्याचे राणे यांनी सांगितले.
भारताला मोदींनी करोनामधून वाचवलं. करोना संपला आहे. मात्र महाराष्ट्रात वाढतोय. अधिवेशन दोन दिवसांत संपविण्यासाठी करोना वाढत असल्याची टीका राणे यांनी महाविकास आघाडीवर केली आहे. केंद्र सरकारने आरोग्य विभागासाठी केलेली तरतूद कौतुकास्पद असल्याचे राणे यांनी सांगितले.