नवी दिल्ली – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी तिसऱ्या आत्मनिर्भर पॅकेजची आज घोषणा केली आहे. करोना काळात भारतीय अर्थव्यवस्थेला आणखी मजबूत करण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी करोनामुळे नोकरी गमवावी लागलेल्यांना पुन्हा सक्षमपणे उभे करण्यासाठी महत्वपूर्ण घोषणा केली आहे.
ज्यांनी पीएफसाठी ‘आत्मनिर्भर भारत रोजगार योजने’ अंतर्गत नोंदणी केली नाही आणि ज्यांचा पगार १५ हजारापेक्षा कमी आहे. तसेच करोना काळात ज्यांची नोकरी गेली आहे, अशा बेरोजगारांना ईपीएफओअंतर्गत आणून पीएफचा लाभ त्यांना देण्यात येणार असल्याची माहिती निर्मला सीतारमण यांनी दिली. संघटित क्षेत्रातील कामगारांना सीतारमण यांच्या या घोषणेमुळे मोठा लाभ मिळणार आहे.
त्याचप्रमाणे १ मार्च २०२० पासून ३० सप्टेंबर २०२० दरम्यान जर तुमची नोकरी गेली असेल आणि १ ऑक्टोबर नंतर पुन्हा रोजगार मिळाला असेल तरी देखील या सरकारी योजनेचा लाभ मिळेल. मात्र कर्मचाऱ्यांचा पगार१५ हजारांपेक्षा कमी असणे गरजेचे आहे.
नव्याने नोकरी लागलेल्या कर्मचाऱ्यांना देखील या योजनेअंतर्गत फायदा मिळणार आहे. ज्या कंपन्यांमधील कामगारांची संख्या एक हजारापर्यंत आहे. अशा कंपन्यांनी नवीन कामगार भरती केल्यास सरकार दोन वर्ष या नव्या कामगारांच्या पीएफचा संपूर्ण २४ टक्के हिस्सा सबसिडी म्हणून देणार आहे. १ ऑक्टोबर २०२० पासून ही योजना लागू असणार आहे.