नवी दिल्ली – करोना व्हायरसमुळे परिणाम झालेल्या अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारमण लवकरच नवे आर्थिक पॅकेज जाहीर करणार असल्याची माहिती आर्थिक व्यवहार सचिव तरुण बजाज यांनी मंगळवारी दिली.
विविध क्षेत्रांनी अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी काय करण्याची गरज आहे या संदर्भात अर्थ मंत्रालयाला सूचना केल्या आहेत. यावर अर्थमंत्रालयात विचार विनिमय चालू आहे. पॅकेज लवकरच दिले जाणार आहे, मात्र नेमकी तारीख आपण सांगू शकणार नाही, असे बजाज म्हणाले.
मार्च महिन्यात अर्थमंत्री सीतारमण यांनी 20 लाख कोटीच्या योजना जाहीर केल्या होत्या. गेल्या महिन्यात मागणी वाढविण्यासाठी दुसऱ्या पॅकेजअंतर्गत आणखी काही सवलती देण्यात आल्या होत्या. आता आणखी एक पॅकेज दिवाळीपूर्वी जाहीर केले जाण्याची शक्यता वृत्तमाध्यमांनी व्यक्त केली होती.
महागईबद्दल बोलताना बजाज म्हणाले की, महागाई काही परिस्थितीजन्य कारणामुळे निर्माण झाली असून ती लवकरच कमी होईल. अर्थव्यवस्था सुधारत असल्याची लक्षणे दिसून येत असल्याचे त्यांनी सांगितल.