नवी दिल्ली – मोदी सरकारच्या गैरव्यवस्थेमुळेच देशातील करोना लसीकरणाचे तीन तेरा वाजले आहेत, असा आरोप कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, सरकारने लसीची निर्यात केल्यानेच देशात लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे.
निवडणुकीसाठी घेतलेल्या मोठ्या सभा, रॅली, धार्मिक कार्यक्रमांमध्ये झालेली गर्दी यामुळे करोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात झाला. त्याकडे आपण दुर्लक्ष केले. त्याचे परिणाम सध्या देश भोगतो आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
सोनिया गांधी यांनी आज कॉंग्रेसशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली. त्यावेळी त्या बोलत होत्या. सोनियांनी या राज्यातील करोना उपाययोजनांची माहिती घेतली. करोना उपाययोजनांबाबत कॉंग्रेसशासित राज्यांनी अधिक पारदर्शकपणा बाळगला पाहिजे अशी सूचनाही त्यांनी केली.
रुग्णांना बेड्स कमी पडू देऊ नका, तसेच औषधे आणि व्हेंटिलेटर्सही पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून द्या, अशा सूचना त्यांनी केल्या. लसीकरण सुरळीत करण्याचा प्रयत्न करा, असेही त्यांनी नमूद केले. कॉंग्रेस नेते राहुल गांधी हेही यावेळी उपस्थित होते.