चंडीगढ -भारतीय जनता पार्टीच खरी तुकडे-तुकडे गॅंग आहे. तो पक्ष हिंदू आणि शिखांना एकमेकांविरोधात उतरवरून पंजाबमध्ये धार्मिक द्वेष पसरवण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप शिरोमणी अकाली दलाचे (एसएडी) अध्यक्ष सुखबीरसिंग बादल यांनी मंगळवारी केला.
शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी एसएडीने अलिकडेच भाजपबरोबरची मैत्री तोडली.
यातच , ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी देखील भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.
अदानी और अंबानी के टुकड़ों पर पलने वाले लोग, आज हमारे किसानों को टुकड़े-टुकड़े गैंग कह रहे हैं! 😛
— Prashant Bhushan (@pbhushan1) December 15, 2020
काय म्हणाले प्रशांत भूषण
“अदानी आणि अंबानींच्या तुकड्यांवर जगणारे लोक आज आपल्या शेतकऱ्यांना तुकडे तुकडे गँग म्हणत आहेत. आता मोदी चौकीदार आहेत हे मान्यच करावं लागेल. प्रश्न फक्त इतका आहे की ते चौकीदारी कोणाची करतात. अदानी-अंबानींची की शेतकऱ्यांची?” असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
दरम्यान, इतर पक्षाकडून ही सातत्याने भाजपवर टीकेची झोड उठवली जात आहे. केंद्र सरकारच्या बाजूने बोलणाऱ्याचा उल्लेख देशभक्त म्हणून केला जातो. तर, विरोधात बोलणाऱ्याला तुकडे-तुकडे गॅंगचा सदस्य म्हटले जाते. खरेतर, भाजपनेच राष्ट्रीय ऐक्याचे तुकडे केले आहेत. त्या पक्षाने हिंदूंना मुस्लिमांविरोधात भडकावले. आता शांतताप्रिय पंजाबी हिंदूंना त्यांच्या शीख बांधवांविरोधात आणि विशेषत: शेतकऱ्यांविरोधात चिथावण्याचे प्रयत्न होत आहेत, असे ट्विट बादल यांनी केले. केंद्रीय कृषी कायद्यांबाबतचा मग्रूर दृष्टिकोन सोडून भाजपने शेतकऱ्यांच्या मागण्या स्वीकाराव्यात, असे आवाहनही त्यांनी केले. केंद्रीय कृषीकायदे मागे घेण्याच्या प्रमुख मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनावरून पंजाबमधील राजकारण तापले आहे.