नवी दिल्ली – कच्च्या तेलाच्या किंमतीत होणाऱ्या घसणीचा फायदा सामान्य लोकांना झाला पाहिजे. परंतु प्रत्येक वेळी भाजपा सरकार उत्पादन शुल्क वाढवून हा फायदा आपल्या सुटकेसमध्ये भरत आहे. जो पैसा मिळत आहे त्यातून मजुर, मध्यम वर्ग, शेतकरी आणि उद्योंगाना कोणताही फायदा मिळत नाही. अखेर एवढा पैसा सरकार का जमवत आहे, असा सवाल करत कॉंग्रेसच्या महासचिव प्रियांका गांधी यांनी भाजपावर निशाणा साधला आहे.
करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाउन लागू करण्यात आले आहे. अनेक उद्योगधंदे बंद असल्यानं अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम झाला आहे. कच्च्या तेलाच्या किंमतीतही मोठी घट झाली आहे. परंतु सरकारने उत्पादन शुल्क वाढवण्याच्या निर्णय घेतला आहे. त्यामुळे कच्च्या तेलात झालेल्या घसरणीचा फायदा कोणालाही मिळणार नाही. यावरून मोदी सरकार सतत उत्पादन शुल्क वाढवून संपूर्ण फायदा आपल्या सुटकेसमध्ये भरून घेत आहे, असा आरोप त्यांनी केला आहे.
दरम्यान, प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जुना व्हिडीओ ट्विट करून त्यांनी दिलेल्या आश्वासनाची आठवण करून दिली आहे.