नवी दिल्ली – मोदी सरकार रोजगारासाठी हानीकारक आहे. जनतेने आत्मनिर्भरतेचे ढोंग करावे अशी त्या सरकारची अपेक्षा आहे, असा शाब्दिक हल्लाबोल कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी केला.
देशातील बेरोजगारीच्या विदारक स्थितीवर प्रकाश टाकणारा एक अहवाल प्रसिद्ध झाला आहे. मागील महिन्यात (ऑगस्ट) देशातील 15 लाखांहून अधिक नागरिकांनी नोकऱ्या गमावल्याचे त्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यावर राहुल यांनी ट्विटरवरून प्रतिक्रिया दिली आहे. ते सरकार मित्रांचा संबंध नसलेल्या कुठल्या व्यवसायाला किंवा रोजगाराला चालना आणि पाठिंबा देत नाही. उलट, ज्यांच्याकडे नोकऱ्या आहेत; त्या हिरावून घेण्यात सरकार गुंतले आहे, असा आरोप त्यांनी केला.
सर्वांत मोठा राष्ट्रीय मुद्दा बेरोजगारी आहे. त्यावर काही थेट उपायही आहेत. मात्र, सरकारला उपाय नको आहेत, असे टीकास्त्र त्यांनी सोडले. सार्वजनिक कंपन्या आणि बॅंका विकू नयेत. लहान आणि मध्यम उद्योगांना आर्थिक मदत पुरवावी. मित्रांऐवजी देशाचा विचार करा, असा सल्लाही त्यांनी सरकारला दिला. राहुल सातत्याने सरकारवर काही निवडक उद्योगपतींना मदत करत असल्याचा आरोप करत आहेत. त्या उद्योगपतींचा उल्लेख ते सरकारचे मित्र म्हणून करतात.