नवी दिल्ली – भारतीय हद्दीत कोणीही अतिक्रमण केलेले नाही किंवा कोणीही भारतीय चौकी ताब्यात घेतलेली नाही असे जे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे त्यावर जोरदार निशाणा साधताना कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटले आहे की म्हणजे याचा अर्थ भारताची भूमी चीनला आंदण देण्यात आली आहे असा होतो.
आपल्या ट्विटर अकौंटवर राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, जर ती चीनची भूमी होती तर आपले सैनिक कसे मारले गेले? आणि आपले सैनिक नेमके कोणाच्या हद्दीत शहीद झाले? असे प्रश्न उपस्थित करून मोदींनी भारतीय भूभाग चीनला सरेंडर केला आहे असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे.
मोदींनी केलेले विधान त्यांच्याच मंत्रिमंडळातील विदेशमंत्री एस. जयशंकर यांच्या विधानाला छेद देणारे ठरले आहे. त्यावरून मोठेच काहूर माजले आहे. एस. जयशंकर यांनी म्हटले होते. चीनने प्रत्यक्ष ताबारेषेवर भारतीय हद्दीत बांधकाम करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे तेथे वाद निर्माण झाला होता. चीनने पूर्वनियोजित पद्धतीने ही कृती केली आणि त्यामुळेच तेथे हिंसाचार झाला, असे विधान परराष्ट्र मंत्रालयाने केल्यानंतर जेव्हा मोदी म्हणतात की चीनने भारतीय हद्दीत घुसखोरीच केली नाही तेव्हा त्याविषयी मोठाच संभ्रम निर्माण होतो, असा आक्षेप कॉंग्रेसकडून नोंदवला गेला आहे.
या संबंधात ज्येष्ठ कॉंग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी म्हटले आहे की, जर भारतीय हद्दीत कोणीही घुसखोरी केली नाही असे जर मोदी म्हणत असतील तर 5 आणि 6 मेच्या रोजी तेथे नेमके काय घडले? आणि 16 व 17 जूनला दोन्ही सैन्यात संघर्ष कशावरून झाला? त्यात भारताचे 20 जवान कसे शहीद झाले, असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले. जर प्रत्यक्ष ताबा रेषेचे उल्लंघनच झाले नाही असे म्हणता तर दोन्ही बाजूंच्या लष्करामध्ये इतके दिवस कशाची चर्चा सुरू आहे? असा सवालही त्यांनी केला आहे. असे विधान करून मोदींनी चीनला क्लीन चिट दिली आहे काय? हा प्रमुख सवाल चिदंबरम यांनी उपस्थित केला आहे. असे जर असेल तर मग आता चीनशी चर्चा करून उपयोग काय? आणि आता मेजर जनरल दर्जाचे अधिकारी चिनी लष्करी अधिकाऱ्यांसमवेत नेमकी कशाची चर्चा करीत आहेत, अशी प्रश्नांची सरबत्तीही त्यांनी केली आहे. पंतप्रधानांचे कालचे निवेदन धक्कादायक आणि विनाशकारी आहे, असे आणखी एक कॉंग्रेस नेते जयराम रमेश यांनी म्हटले आहे.
चीन सीमेवरील भूगोल आणि इतिहास बदलला गेला आहे, अशी टिप्पणीही रमेश यांनी केली आहे. कॉंग्रेसचे प्रवक्ते मनिष तिवारी यांनीही अशाच स्वरूपाची प्रश्नांची सरबत्ती मोदींवर केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, भाजपचेच खासदार तापीर गाओ यांनी चीनने अरुणाचल प्रदेशातील भूमीही मोठ्या प्रमाणावर व्यापली असल्याचे म्हटले आहे ते खोटे आहे काय, असा प्रश्नही तिवारी यांनी उपस्थित केला आहे