नवी दिल्ली – कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार शाब्दिक हल्लाबोल केला. बेरोजगारी, महागाई आणि सामाजिक अशांतता हे सध्या देशाला भेडसावणारे प्रमुख मुद्दे आहेत. त्यामुळे युवकांमधील अस्वस्थता आणि चीड वाढीस लागली आहे.
तीसुद्धा मोठी समस्याच आहे. मात्र, तोडगा काढणे तर सोडाच; पंतप्रधान त्या मुद्द्यांविषयी बोलतही नाहीत, असे राहुल यांनी ट्विटरवरून म्हटले. संबंधित मुद्द्यांवरून संतापाची भावना व्यक्त करणाऱ्या उत्तरप्रदेशातील युवकांचा एक व्हिडीओही राहुल यांनी शेअर केला.
उत्तरप्रदेशात गुरूवारी विधानसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान झाले. त्याचे औचित्य साधून राहुल यांनी मोदींवर निशाणा साधला. जनतेशी निगडित मुद्द्यांवर मोदी मौन बाळगून असल्याचा आरोप कॉंग्रेसकडून सातत्याने केला जातो.