नवी दिल्ली – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केंद्रीय मंत्र्यांच्या गटाशी चर्चा केली. शेतकरी संघटनांपुढे सरकारकडून मांडल्या जाणाऱ्या प्रस्तावांवर त्या चर्चेचा भर राहिल्याचे समजते.
केंद्रीय मंत्री आणि शेतकरी संघटनांच्या नेत्यांमध्ये चर्चेची आणखी एक फेरी झाली.
त्याआधी मोदींनी अमित शहा, राजनाथ सिंह, नरेंद्रसिंह तोमर आणि वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांच्याशी चर्चा केली. केंद्रीय कृषी कायदे मागे घेण्याची मागणी करत शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमांलगत आंदोलन सुरू केले आहे. तर, त्या कायद्यांचे शेतकऱ्यांच्या दृष्टीने असलेले महत्त्व पटवून देण्यासाठी सरकारनेही कंबर कसली आहे.
मात्र, आंदोलनामुळे निर्माण झालेली कोंडी फोडण्यासाठी सरकारने शेतकरी संघटनांशी चर्चेची प्रक्रिया सुरू केली आहे. याआधी झालेल्या चर्चा निष्फळ ठरल्याने सरकारकडून शेतकरी संघटनांपुढे मांडावयाचे काही प्रस्ताव तयार करण्यात आले.
त्याचा आढावा मोदी यांनी मंत्र्यांसमवेतच्या बैठकीत घेतला. शेतकऱ्यांनी दिल्लीलगत आंदोलन सुरू केल्यानंतर मोदींनी मंत्र्यांची घेतलेली ती पहिलीच बैठक ठरली. त्यामुळे कोंडी फोडण्यासाठी मोदीही सरसावल्याचे सूचित होत आहे.