जोधपुर – सध्याची लोकसभा निवडणूक ही लोकशाही वाचवण्यासाठी महत्वाची आहे. मोदी हुकुमशाही प्रवृत्तीने लोकांना राष्ट्रवाद शिकवू शकत नाहीत. किंवा राष्ट्रवादाच्या नावाने ते आता लोकांना मुर्खही बनवू शकत नाहीत असे प्रतिपादन कॉंग्रेसचे नेते व राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केले आहे. लोकांच्या हितासाठी केंद्रात आता सत्ताबदल होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. राजस्थानात दोन टप्प्यांमध्ये मतदान होत असून त्यातील पहिल्या टप्प्यासाठीचे मतदान उद्या होत आहे. त्या पार्श्वभूमीवर पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. ते म्हणाले की मोदींच्या तावडीतून देशाची लोकशाही वाचवणे हे आमचे प्रमुख उद्दीष्ठ आहे असे ते म्हणाले. भाजपने लोकांची दिशाभुल करण्याचा सर्व तऱ्हेचा प्रयत्न चालवला आहे पण आता लोक त्यांना भुलतील असे वाटत नाहीं. ते म्हणाले की जगातल्या प्रत्येक हुकुमशहाने आपली सत्ता गाजवण्यासाठी केवळ राष्ट्रवादाचाच आधार घेतल्याचा इतिहास आहे आणि मोदी त्याच वळवणावर आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत मोदींना केवळ 31 टक्के लोकांनी मतदान केले. 69 टक्के लोकांनी त्यांच्या विरोधात मतदान केले. याचा अर्थ हे 69 टक्के लोक देशद्रोही आहेत काय असा सवाल त्यांनी केला. राजस्थानातील भाजपचे उमेदवार केवळ मोदींच्या नावावर निवडणूक लढवत आहेत. पण ते विकास किंवा लोकांच्या कोणत्याही प्रश्नावर बोलतच नाहींत. या राज्याने सन 2014 च्या निवडणुकीत भाजपच्या सर्व उमेदवारांना निवडून दिले होते. पण त्यांना कोणतेही काम करण्यास अपयश आले आहे. त्याची कारणे या पक्षाने लोकांना द्यावीत अशी मागणीही त्यांनी केली.