नवी दिल्ली, दि. 7 – देशातील कोविडची स्थिती वाईटाकडून अधिक वाईटाकडे चालली आहे, त्याची कोणतीही जबाबदारी पंतप्रधान आणि आरोग्यमंत्री घेण्यास तयार नाहीत. मोदी आणि हर्ष वर्धन यांनी लोकशाही तत्त्वाची अक्षरशः चेष्टाच चालवली आहे, अशा शब्दांत ज्येष्ठ कॉंग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी सरकारवर तोफ डागली आहे.
देशात आज पुन्हा करोनाचे 4 लाख 14 हजार नवीन रुग्ण आढळून आल्यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया नोंदवली आहे. अशा अवस्थेतही देशात लसीचा अपुरा पुरवठा होतो आहे तरीही सरकार आपली जबाबदारी झटकत आहे आणि वस्तुस्थितीचा इन्कार करीत आहे.
तमिळानाडूत 45 वर्षांवरील सर्वांना लस उपलब्ध नाही. त्यांना पहिला डोस मिळण्यातच अडचण निर्माण झाली असून अगदी थोड्या लोकांना लसीचा दुसरा डोस मिळाला आहे. 18 ते 44 वयोगटातील कोणालाच लस उपलब्ध नाही अशी स्थिती आहे. अन्य राज्यातही अशीच परिस्थिती आहे. पंतप्रधान आणि आरोग्यमंत्री कोणतीच जबाबदारी घ्यायला तयार नाहीत अशी खंतही त्यांनी व्यक्त केली आहे.