खरगोने (मध्यप्रदेश): संपुर्ण देशातून भाजपला मोठा प्रतिसाद मिळाला असून काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत आणि कच्छ पासून कामरूप पर्यंत अब की बार तिनसो पार, फिर एक बार मोदी सरकार अशीच प्रतिक्रीया ऐकायला मिळत आहे असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथील प्रचार सभेत केली. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी त्यांनी येथे घेतलेल्या सभेत भाजपला पुर्ण बहुमताने सत्ता मिळेल असा दावा केला आहे.
येथील मतदारांना उद्देशून ते म्हणाले की येत्या रविवारी तुम्ही जेव्हा शेवटच्या टप्प्यातील मतदानासाठी जाल तेव्हा तुमच्या हातून एक इतिहास घडणार आहे. तुम्ही सलग दुसऱ्यांदा पुर्ण बहुमताचे सरकार निवडून देणार आहात. गेल्या अनेक दशकांमध्ये असा प्रकार आपल्या देशात घडला नव्हता असे त्यांनी म्हटले आहे. यंदाची निवडणूक अनेक अर्थाने वेगळी आहे यावेळी लोक कोणत्याही पक्षासाठी नव्हे तर नवीन भारतासाठी मतदान करणार आहे असे ते म्हणाले.
यावेळी बोलताना त्यांनी कॉंग्रेसच्या मध्यप्रदेशातील सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत फसवणूक केली असल्याचा दावा केला. ते म्हणाले की सत्तेवर आल्यावर पुढील दहा दिवसात कर्जमाफी करण्याची घोषणा त्यांनी केली होती. पण प्रत्यक्षात काय घडले? लोकांना बॅंकांनी कर्जमाफी तर दिली नाहींच पण पहिल्या कर्जाच्या थकबाकीमुळे त्यांनी नवीन कर्जेही मिळणे मुष्कील झाले असे ते म्हणाले. राज्यातील दलित आणि अदिवासी मुलांना त्यांचे स्टायपेंड वेळेत मिळत नाही, राज्यातील विजेची स्थिती अत्यंत भीषण झाली आहे अशा शब्दात त्यांनी मध्यप्रदेश सरकारवर टीकेचे ताशेरे ओढले.