– एकनाथ शिंदे, नगरविकास मंत्री
महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री, शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि आम्हा शिवसैनिकांचे लाडके उद्धव ठाकरे साहेब यांचा आज जन्मदिवस. उद्धवसाहेबांचा वाढदिवस शिवसैनिकांसाठी नेहमीच खास असतो. पण यंदाचा वाढदिवस हा उद्धवसाहेब राज्याच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान झाल्यानंतरचा पहिलाच असल्यामुळे तो शिवसैनिकांसाठी आणि उद्धवसाहेबांच्या चाहत्यांसाठी अधिकच खास आहे.
खरं म्हणजे सामान्य परिस्थिती असती तर आम्ही सर्वांनी तो जंगी स्वरूपात साजरा केला असता, पण सध्या केवळ राज्यावरच नव्हे, तर देशावर आणि जगावर करोनाचं संकट आहे. येणारा प्रत्येक दिवस नवी आव्हानं घेऊन येत आहे. आपल्याला सर्वस्वी अपरिचित असलेला हा आजार दररोज त्याचं वेगळं रूप दाखवत असल्यामुळे आपण अजूनही ट्रायल अँड एरर मोडमध्ये आहोत. नेमकं काय करायचं, या आजाराशी कसं लढायचं, त्यावरचे उपचार काय असले पाहिजेत, त्याचा फैलाव नेमका किती प्रमाणात होईल, याबाबत नाही म्हटलं तरी अद्यापही काही प्रमाणात अनिश्चितता आहे. इतकंच नव्हे, तर या आजाराचा फैलाव नेमका कशा कशा प्रकारे होतो, याबाबत आरोग्य तज्ज्ञांमध्येच अद्याप एकमत नाही. स्पर्शातून किंवा बाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्यास करोनाची बाधा होते, हे निश्चित आहे, पण हवेतून त्याचा फैलाव होतो की नाही, याबाबत अद्याप गोंधळ आहे. अशी सर्व गोंधळाची परिस्थिती असतानाही, प्रशासनाचा फारसा पूर्वानुभव नसताना उद्धवसाहेबांनी गेल्या चार महिन्यांत या राज्याचं ज्या संयतपणे आणि कुशलपणे नेतृत्त्व केलं आहे, त्याला तोड नाही.
आमच्यासारख्या शिवसैनिकांसाठी त्यांचा संयमी स्वभाव नवा नाही. त्यांच्यापर्यंत असंख्य लोक अनेक प्रकारच्या तक्रारी घेऊन येत असतात, आम्हीही पक्षप्रमुख म्हणून त्यांच्यापर्यंत विविध विषय घेऊन जायचो. पण त्यांनी कधीही घाईघाईने एखादी कृती केल्याचं मला तरी आठवत नाही. सर्व बाजूंचा विचार करून, संबंधित सर्वांची मतं आजमावून मगच ते निर्णय घेतात आणि एकदा निर्णय घेतला की, मग त्यापासून मागे हटत नाही. मग त्या निर्णयाचे वाट्टेल ते परिणाम भोगण्याची त्यांची तयारी असते. त्यांच्या या स्वभावाचं दर्शन महाराष्ट्राला आणि देशाला विधानसभा निवडणुकीनंतरच्या काळात देखील प्रकर्षाने झालं.
उद्धवसाहेब मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले त्यावेळी त्यांना पदाचा अनुभव नाही, प्रशासनाचा अनुभव नाही, अशा शंका काही शंकेखोरांनी व्यक्त केल्या. पण गेल्या आठ महिन्यांच्या आपल्या कार्यकाळात आणि त्यातही विशेषत: गेल्या चार साडेचार महिन्यांच्या करोना कालावधीत उद्धवसाहेबांनी आपल्या संयम पण ठाम नेतृत्वाने या शंकेखोरांचं तोंड बंद करण्याचं काम चोखपणे केलं. कोणाच्या ध्यानीमनीही नसलेल्या शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस या पक्षांच्या आघाडी सरकारचं नेतृत्व उद्धवसाहेब समर्थपणे करत आहेत. करोनाच्या या हातघाईच्या लढाईतही राज्याची अन्य क्षेत्रात पीछेहाट होऊ नये, यासाठी ते आघाडीवर राहून दिशादर्शन करत आहेत, निर्णय घेत आहेत आणि त्या निर्णयांची अमलबजावणी व्हावी, यासाठी दक्ष आहेत. मग ते उद्योगांसोबत झालेले करार असतील किंवा शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी राज्यात ऑनलाइन शिक्षणपद्धतीचा अवलंब करण्याचा निर्णय असेल, उद्धवसाहेबांनी राज्याचा गाडा कुठेही थांबणार नाही, याची सातत्याने काळजी घेतली आहे. मंत्रिमंडळातील सर्व सहकारी एकदिलाने काम करत आहेत.
मुख्यमंत्री उद्धव साहेब, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष व या देशातील ज्येष्ठ, जाणते नेते शरद पवार साहेब आणि कॉंग्रेसच्या अध्यक्ष सोनियाजी गांधी एकमताने अनेक धोरणात्मक निर्णय घेत आहेत. सन 2001 मध्ये उद्धवसाहेब शिवसेनेचे कार्यकारी प्रमुख झाले, तेव्हापासून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे मंत्रालयावर पुन्हा भगवा फडकावण्याचे स्वप्न सत्यात आणण्यासाठी अविश्रांत मेहनत घेत होते. 2001 साली मी ठाणे महापालिकेत सभागृह नेता होतो. तेव्हापासूनच उद्धवसाहेबांची कार्यशैली जवळून पाहाण्याची संधी मिळाली.
बाळासाहेब काय किंवा उद्धवसाहेब काय, वर्तमानपत्रातील एखादी बारीकसारीक बातमी वाचून किंवा अगदी वाचकांनी पत्राद्वारे काही समस्या मांडली असेल तरी ते लगेच फोन करायचे. छोटीशी बातमीदेखील बाळासाहेबांच्या नजरेतून सुटत नसे. उद्धवसाहेब देखील न चुकता सकाळी फोन करायचे. अजूनही करतात. आज राज्याचे मुख्यमंत्री आहेत म्हणून नव्हे, तर तो त्यांच्या कार्यशैलीचा भागच आहे. त्यांच्या संवेदनशीलतेची प्रचिती करोनाकाळात ते ज्या प्रकारे फेसबुक लाइव्हवरून राज्यातील जनतेशी संवाद साधत आहेत, घरातील कुटुंबप्रमुखाप्रमाणे दिलासा देत आहेत, त्यावरून जनतेला आली आहे. हीच संवेदनशीलता त्यांच्या सर्व कामांमध्ये दिसते. त्यामुळे पुढील केवळ पाचच वर्षं नव्हे, तर बरीच वर्षं महाराष्ट्राला आणि आम्हा शिवसैनिकांनाही उद्धवसाहेबांचं नेतृत्व लाभत राहो, अशीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि त्यांना वाढदिवसाच्या मन:पूर्वक शुभेच्छा देतो.