संगमनेर – मान्सूने संगमनेर शहरात सोमवारी दुपारी दमदार हजेरी लावली. पावसात डांबरीकरण करू नये, असे आदेश असले तरी शहरातमध्ये चक्क पावसात नगरपालिकेकडून नवीन नगर रस्त्यावर डांबरीकरण केले गेले. त्यामुळे पालिकेच्या बांधकाम विभागाच्या कामाबाबत नागरिक आश्चर्य व्यक्त करत आहेत.
डांबरीकरणाची कामे 15 मे नंतर करू नयेत, असे सार्वजनिक बांधकाम विभागाचे आदेश आहे. पाणी पडल्यानंतर डांबर निघते व डांबरीकरणाचा खर्च वाया जातो. त्यामुळे ही कामे आधीच पूर्ण व्हावीत, असे अपेक्षित आहे.
संगमनेर शहरातील नवीन नगर रस्त्यावरील भुयारी गटारीच्या कामासाठी रस्ता खणल्याने गेली महिन्यापासून नागरिकांना खड्ड्यांचा त्रास सहन करावा लागल आहे. चेंबरला पाईप जोडण्यासाठी खणलेल्या रस्त्यांवर अलिकडेच पॅचवर्क केले गेले असून त्यावर पाऊस पडल्याने ते खराब होण्याची शक्यता आहे.
वेळीत पालिकेकडून डांबरीकरणाच्या पॅचवर्कची काम वेळेत पूर्ण न झाल्याने ती अगदी आतापर्यंत सुरूच आहेत. यावरून पालिकेच्या बांधकाम विभागाचा सावळा गोंधळ समोर आला आहे. पावसात डांबरीकरण व्हायला नको, हे खरे असले तरी नागरिकांची गैरसोय लक्षात घेता डांबरीकरणाचे पॅचवर्क करावे लागते, असे उत्तर नगरपरिषद बांधकाम अभियंता आर.व्ही. सुतावणे यांनी दिले तर मुख्याधिकारी सचिन बांगर यांनी फोन उचलण्यास असमर्थता दर्शवली. मात्र नवीन नगर रस्त्यावरील भुयारी गटारीचे कामानंतरही आज पुन्हा पावसात रस्त्यावरून गटारीचे पाणी वाहिल्याचे नागरिकांनी कामाच्या दर्ज्याबद्दल नाराजी व्यक्त केली.