हिमांशू
“हॅलो… नमस्ते. माझा आता पुण्यात प्रयोग सुरू आहे… हो, गर्दी चांगली आहे. मुंबईत आल्यावर मी तुम्हाला भेटतो. पाऊस अजून चालू आहे का हो तिकडे? अवघड आहे मग! हो, हो स्क्रिप्ट वाचलंय मी. चांगलं वाटलं. बोलू की आल्यावर. बाय!’ एवढं बोलून रंगमंचावरचा अभिनेता मोबाइल खिशात ठेवतो. फोन येण्यापूर्वी कुठला प्रसंग चालला होता, हे नीट आठवतो. आपली जागा घेऊन संवाद म्हणू लागतो, तेवढ्यात अभिनेत्रीच्या पर्समधला मोबाइल वाजतो. प्रेक्षकांकडे पाहून ती “एक्सक्यूज मी’ असं म्हणते आणि फोन रिसीव्ह करते. आता तिचा फोन होईपर्यंत नाटकातला प्रवेश सुरू होणार नाही, हे लक्षात आल्यामुळं प्रेक्षकही पाय ताणून रिलॅक्स होतात… कसा वाटतोय सीन? अतर्क्य, कल्पनेपलीकडला वाटतोय ना?
अशा प्रकारे नाटक सादर करायचं ठरवलं तर दोन तासांचं नाटक साडेतीन तास चालेल, होय ना? परंतु उद्विग्न रंगकर्मींना हाच सल्ला देण्याचा आमचा मानस आहे. प्रेक्षागृहातला एक जरी मोबाइल वाजला, तरी रंगमंचावरच्या सगळ्या नटांनी आपापले सेलफोन ऑन करायचे आणि ते घेत-घेत प्रयोग सादर करायचा. इतकी वर्षे विनवण्या करूनसुद्धा नाट्यगृहात येताना मोबाइल बंद करावा, हे वळण प्रेक्षकांना लागू नये, हे नाटकवाल्यांच्या दृष्टीनं किती अतर्क्य आहे, हे मोबाइलवेड्या प्रेक्षकांना असा एखादा अतर्क्य प्रयोग पाहिल्याशिवाय समजणार नाही. “लोकांचे फोन महत्त्वाचे. त्यांच्या फोनमध्ये आमची लुडबूड नको. त्यामुळं नाटकाचे प्रयोग यापुढे बंदच करावेत हे उत्तम!’ अशी टोकाची प्रतिक्रिया देण्याची वेळ गाजलेल्या कलावंतावर येते, तेव्हा त्याच्या मनाला किती यातना होत असतील, याचा विचार करण्याइतकी संवेदनशीलता उरलीय की नाही कुणास ठाऊक! पण कलावंत संवेदनशील असतो.
प्रेक्षकांना तो “मायबाप’ म्हणतो. “रंगदेवता आणि रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून’ तो प्रयोगाला उभा राहतो. पण या विनम्र अभिवादनाला आपण कशाने उत्तर देतो? कितीही सांगितलं तरी न ऐकण्याच्या उद्धटपणाने! एका अभिनेत्याच्या उद्विग्न प्रतिक्रियेपाठोपाठ अनेक कलावंतांच्या प्रतिक्रिया येऊ लागतात. काहीजणांनी तर नाट्यगृहाच्या परिसरात मोबाइल जॅमर बसवण्याची सूचना करतात. पण असं केलं तर प्रयोगाशी संबंधित सर्वच व्यवहार ठप्प होतील. बुकिंग ऑफिसपासून बॅकस्टेजवाल्यांपर्यंत कुणाचेच फोन लागणार नाहीत. त्यापेक्षा, ज्याचा मोबाइल ऐन प्रयोगात वाजला, त्या प्रेक्षकाला “आपलं चुकलं’ एवढं जरी मनापासून वाटलं, तरी सध्याची चर्चा कारणी लागली असं म्हणता येईल. अन्यथा आणखी एक पर्याय आमच्या डोळ्यासमोर आहे.
नाट्यशास्त्राचे धडे देणाऱ्या संस्थांनी आणि नाट्यशिबिरं घेणाऱ्यांनी उदयोन्मुख कलावंतांसाठी “मोबाइल प्रतिकारक्षमता’ हा नवा विषय अभ्यासक्रमात समाविष्ट करावा. भरपूर प्रॅक्टिकल्स देऊन कलावंतांना “अभेद्य’ बनवावं. या विषयाचं गुणांकन काटेकोरपणे करावं आणि अव्वल गुण मिळवणाऱ्यांना नाट्यनिर्मात्यांनी प्राधान्यक्रमानं संधी द्यावी. मोबाइल आपल्या हाती येऊन तब्बल वीस वर्षे उलटली. तो केवळ दोन तासांसाठी दूर ठेवणं आपल्याला जमत नसेल, तो आपला अवयवच बनला असेल, तर अन्य कोणता मार्ग उरतो?