नवी दिल्ली – देशातील कोविड लसीकरणासाठी मोबाईल तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. देशात 5 जी सेवा वेळेत उपलब्ध होण्याची गरजही त्यांनी यावेळी व्यक्त केली. इंडिया मोबाईल कॉंग्रेस मध्ये बोलताना त्यांनी हे प्रतिपादन केले.
ते म्हणाले की मोबाईल तंत्रज्ञानामुळे लक्षावधी लोकांना अब्जावधी डॉलर्सचा लाभ मिळू शकला आहे. कॅशलेस व्यवहारांना मोबाईल तंत्रज्ञानामुळे मोठाच लाभ झाला आहे असेही त्यांनी नमूद केले. याच तंत्राचा उपयोग करून आम्ही भारतात कोविड लसीकरणाचा जगातील सर्वात मोठा कार्यक्रम हाती घेणार आहोत. मात्र या विषयीचा अधिक तपशील त्यांनी सांगितला नाही.
यावेळी बोलताना मोदी म्हणाले की,तंत्रज्ञानात मोठे फेरबदल होत असल्याने भविष्यात आपल्याला अनेक संधी उपलब्ध होणार आहेत. त्यासाठी आपल्याला एकत्रित काम करण्याची गरज आहे. तंत्रज्ञान साधने, त्याचा विकास आणि निर्मीती या बाबतीत भारत हा जगाचे मुख्य केंद्र बनला पाहिजे अशी अपेक्षाहीं त्यांनी व्यक्त केली.
भारत आज मोबाईल निर्मीतीसाठीचे एक महत्वाचे केंद्र बनला आहे. मोबाईल इंडस्ट्रीला लाभ देण्यासाठी सरकारने उत्पादन आधारीत लाभ योजना सुरू केली आहे. ती या क्षेत्राच्या विकासाला उपयोगी पडेल असेही त्यांनी नमूद केले. देशातील सगळी खेडी येत्या तीन वर्षात फायबर ऑप्टिकने जोडण्याचा कार्यक्रम सुरू आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.
वाढत्या तंत्रज्ञान साधनांमुळे देशात इलेक्ट्रॉनिक कचरा आणि टाकाऊ पदार्थही मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहेत त्याची विल्हेवाट लावण्यासाठी या क्षेत्रातील उद्योगांनी एक टास्कफोर्स स्थापन केला पाहिजे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.130 कोटींच्या या देशात किमान 100 कोटी लोक मोबाईलधारक आहेत. आणि देशात 75 कोटी लोक इंटरनेटचा वापर करीत आहेत अशी माहितीहीं मोदींनी यावेळी दिली.