Mobile Tariff Hike: भारतातील मोबाइल वापरकर्त्यांना लवकरच आर्थिक झटका बसण्याची शक्यता आहे. टेलिकॉम कंपन्या २०२५ च्या अखेरीस मोबाइल रिचार्ज प्लॅन्सच्या किमती वाढवण्याच्या तयारीत आहेत. टेलिकॉम क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, नोव्हेंबर-डिसेंबर २०२५ च्या सुमारास प्रीपेड आणि पोस्टपेड प्लॅन्सच्या दरात १० ते २० टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते. गेल्या सहा वर्षांत टेलिकॉम कंपन्यांनी टॅरिफ वाढवण्याची ही चौथी वेळ ठरेल.
प्रीपेड-पोस्टपेड प्लॅन्स १०-२०% महागणार
वाढत्या खर्चामुळे आणि ५जी नेटवर्कच्या विस्तारासाठी लागणाऱ्या गुंतवणुकीमुळे टेलिकॉम कंपन्या टॅरिफ वाढवण्याचा विचार करत आहेत. भारती एअरटेल, रिलायंस जिओ आणि व्होडाफोन आयडिया या कंपन्या नेटवर्क विस्तार, स्पेक्ट्रम खरेदी आणि नियामक शुल्कांसाठी मोठी गुंतवणूक करत आहेत. व्होडाफोन आयडियाने नुकतीच ३६,९५० कोटी रुपयांच्या थकीत स्पेक्ट्रम थकबाकीची रक्कम सरकारच्या हिस्सेदारीत रूपांतरित करण्यास मंजुरी मिळवली आहे. यामुळे सरकारचा कंपनीतील हिस्सा २२.६% वरून ४९% पर्यंत वाढला आहे.
कंपन्या का वाढवत आहेत दर?
बर्नस्टीन रिसर्चच्या अहवालानुसार, ही दरवाढ ‘रेट रिपेअर’ धोरणाचा भाग आहे, ज्यामुळे टेलिकॉम कंपन्यांच्या उत्पन्नात स्थिरता येईल. तज्ज्ञांचा अंदाज आहे की, पुढील काही वर्षांत टॅरिफमध्ये हळूहळू वाढ होत राहील आणि २०२७ पर्यंत प्रति वापरकर्ता सरासरी उत्पन्न (ARPU) ३०० रुपयेपर्यंत पोहोचेल. २०२४ च्या शेवटच्या तिमाहीत एअरटेलचा ARPU ५.२% वाढून २४५ रुपये, जिओचा २०३ रुपये आणि व्होडाफोन आयडियाचा १६३ रुपये होता. ५जी सेवा आणि डेटा वापर वाढल्याने हे आकडे आणखी वाढण्याची शक्यता आहे.
डिसेंबरपर्यंत दरवाढीची शक्यता
व्होडाफोन आयडियाचे सीईओ अक्षय मूंद्रा यांनी सांगितले की, भारतासारख्या बाजारपेठेत दर ९ महिन्यांनी टॅरिफ वाढ आवश्यक आहे. यामुळे नेटवर्कची गुणवत्ता टिकून राहते आणि आयओटी, एंटरप्राइज सर्व्हिसेस यांसारख्या नव्या तंत्रज्ञानाला चालना मिळते. मोबाइल ग्राहकांना वर्षअखेरीस रिचार्ज प्लॅन्सच्या दरवाढीसाठी तयार राहावे लागेल. मात्र, कंपन्यांचे म्हणणे आहे की, देशभरात उत्तम नेटवर्क आणि सेवा पुरवण्यासाठी ही वाढ गरजेची आहे.