सर्वसामान्यांचे बजेट वाढणार : पूर्व हवेली तालुक्यात युवकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया
सोरतापवाडी- सर्वच मोबाइल कंपन्यांकडून टेरिफ प्लॅनमध्ये 40 ते 50 टक्के दरवाढ केली आहे. त्यामुळे मोबाइल रिचार्ज महागले आहे. सरासरी एका महिन्याकाठी प्रति ग्राहक 50 रुपये खर्च माथी बसला आहे. त्यामुळे घरटी चार मोबाईल गृहीत धरल्यास प्रति कुटुंबामागे दोनशे रुपयांचा खर्च मोबाइल कंपन्यांच्या माथी मारावा लागत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागली आहे. रिचार्ज महागल्यामुळे युवकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
मोबाइल कंपन्यांकडून 3 डिसेंबरपासून टेरिफ प्लॅनमध्ये 50 टक्के वाढ केली आहे. त्यापूर्वी काही कंपन्याकडून दरवाढीचे संकेत मिळाले होते. त्याचवेळी सर्वसामान्य ग्राहकांना दरवाढीची चाहूल लागली होती.
मोबाइल हा सर्वसामान्यांशी कनेक्ट झालेला आहे. माहिती आणि दळणवळणाच्या माध्यमासाठी मोबाइल हा अविभाज्य घटक बनला आहे. प्रत्येक घरटी तीन ते चार मोबाइल कंपन्यांचे ग्राहक आहेत. गेल्या दोन वर्षांपासून मोबाइल कंपन्यांकडून जीवघेणी स्पर्धा सुरू झाली होती. त्याचवेळी ग्राहकांकडून मोफत ऑफरची लयलूट केली होती. त्यावेळी सर्वसामान्य ग्राहक मोफत लयलूटीवर तुटून पडला होता. संपूर्ण जग कवेत आल्याप्रमाणे मोबाइल कंपनीचा ग्राहक कनेक्ट झाला होता.
गेल्या तीन महिन्यांपासून मोबाइल कंपन्यांकडून दरवाढीची चाहूल लागली होती. त्यात मोबाइल कंपन्यांना आर्थिक फटका बसल्यामुळे दरवाढ लागू करण्यात आली आहे. मात्र, युवकांमध्ये नाराजीचा सूर उमटला आहे. देशातील मोबाइल कंपनीकडून शीतयुद्ध सुरू झाले आहे. याची प्रचिती ग्रामीण भागात येत आहे. भविष्यात ही रिचार्जची दरवाढ आणखी वाढण्याची भीती तरूणाईमधून व्यक्त होत आहे.
सोशल मीडियाला आळा
गेल्या सहा ते सात वर्षांपासून सोशल मीडियाचा वापर युवकांमध्ये मोठ्या प्रमाणात सुरू आहे. याच सोशल मीडियामुळे इंटरनेटचे जाळे गावागावांत विणले आहे. त्यामुळे युवकांमध्ये फेसबुक आणि व्हॉट्सऍपचा वापर सुरू आहे. गेल्या दोन वर्षांपासून ग्राहकांना नाममात्र दरात दिली जाणारी सेवा आता महागाईच्या उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. सोशल मीडियाचा वापर करणाऱ्या युवक- युवतींना याची झळ बसली आहे. त्यामुळे यापुढे डेटा पॅक जपूनच वापरावा लागणार आहे.