मुंबई – जर तुम्ही नाटक पाहायला जात असाल तर एक लक्षात ठेवा. नाट्यगृहात प्रवेश करण्याआधीच आपले महत्वाचे कॉल आणि मेसेज आधीच करून घ्या. यापुढं नाट्यगृहात प्रवेश केल्यावर तुम्हाला मोबाईल वर बोलता येणार नाही. कारण आता नाट्यगृहात ‘मोबाईल जॅमर’ बसविले जाणार आहेत. त्यासाठी मुंबई महापालिकेने मान्यता दिली आहे.
नाटक सुरू असताना प्रेक्षकांपैकी कुणाचा तरी मोबाईल वाजणं आणि त्यामुळं सर्वांचाच रसभंग होणं हे प्रकार सातत्यानं होत होते. नाटकापूर्वी उद्घोषणा करून आणि कलाकारांनी विनंती करूनही फारसा फरक पडताना दिसत नव्हता. त्यामुळे आता नाट्यगृहात जॅमर बसविले जाणार आहेत.
दरम्यान, जॅमर बसविण्याच्या या निर्णयावर मराठी अभिनेता सुबोध भावे यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे. ते म्हणाले, ” सक्तीची कृती व जबरदस्तीची शिक्षा याविरोधात मी नेहमीच आहे”. असं म्हणत त्यांनी या निर्णयाचे स्वागत केले.
यापूर्वी देखील नाटकाचे प्रयोग सुरू असताना प्रेक्षकांकडून मोबाईल फोनचा वापर होत असल्याने सुबोध भावे, सुमीत राघवन आणि विक्रम गोखले यांसारख्या कलाकारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती.