लंडन : गेल्या दोन वर्षांच्या कालावधीमध्ये करोना महामारीमुळे शैक्षणिक संस्था बंद असल्याने विद्यार्थ्यांच्या हातात डिजिटल माध्यमे आली आहेत. मोबाईल आणि लॅपटॉपचा वापर वाढला आहे. या अत्याधुनिक उपकरणांच्या अतिरेकी वापरामुळे मुलांचा ही अतिरेकी विकास होत असल्याची बाब समोर आली आहे.
सतत मोबाईल समोर किंवा लॅपटॉप समोर बसल्यामुळे मुलांमधील स्थूलपणा वाढत आहे. त्यांच्या पचनाच्या समस्या निर्माण होत आहेत, पण या व्यतिरिक्तही मुलांच्या हातात नको त्या वयात जास्त ज्ञान पडत असल्याने त्यांचा अतिरेकी विकास होत असल्याची ही गोष्ट समोर आली आहे.
लॅपटॉपसमोर बसून शिक्षण घेणाऱ्या मुलांच्या हातात जी उपकरणे आहेत त्या उपकरणांच्या माध्यमातून त्यांना जी माहिती उपलब्ध होत आहे. ती त्यांच्या वयाप्रमाणे योग्य नसल्याने मुलांचा मानसिक गोंधळ उडू लागला आहे. एखादी माहिती ज्या वयात मिळणे आवश्यक आहे त्यापेक्षा ती खूप लवकर मिळू लागल्याने त्या माहितीचा निश्चित अर्थ लावणे विद्यार्थ्यांना अवघड होत आहे. त्यालाच वैद्यकीय तज्ञांनी मुलांचा अतिरेकी विकास असे म्हटले आहे.
या मानसिक आणि वैचारिक गोंधळामुळे लहान मुलांमधील चिडचिड वाढत आहे. याशिवाय एकटेपणा त्यांना आवडू लागला आहे, त्यांच्यातील नैराश्य वाढत आहे. मैदानावर जाऊन खेळणे किंवा इतर मुलांबरोबर आणि मित्रांबरोबर वेळ घालवणे आता कमी झाले आहे. महामारीच्या काळामध्ये जरी डिजिटल माध्यमाच्या माध्यमातूनच शिक्षण देणे योग्य असले तरी त्यावर ही थोड्याफार प्रमाणात नियंत्रण असायला हवे असेही आता तज्ञांचे मत आहे.
मुलांचा हा अतिरेकी विकास चिंताजनक असल्याची बाबही नोंदवण्यात आली आहे. हेल्थलाईन या नावाच्या वैद्यकीय नियतकालिकात याबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाले असून आपला मुलगा मोबाईल किंवा लॅपटॉपवर किती वेळ घालवतो. यावर पालकांनीलक्ष ठेवून ती वेळ नियंत्रित करावी असा सल्लाही देण्यात आला आहे.