जम्मू – कलम 370 रद्द केल्यानंतर शनिवारी सुरू करण्यात आलेली मोबाइल इंटरनेट सेवा बंद पुन्हा एकदा रविवारी बंद करण्यात आली आहे. जम्मूमध्ये पसरवल्या जाणाऱ्या अफवा थांबवण्यासाठी आणि शांतता कायम ठेवण्यासाठी पाच जिल्ह्यांमध्ये ही सेवा खंडित करण्यात आली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीर खोऱ्यात अफवा पसरविण्याची शक्यता लक्षात घेत हा निर्णय घेण्यात आला आहे. जवळपास पंधवरवाड्यानंतर शुक्रवारी आणि शनिवार रात्री जम्मू, सांबा, कठुआ, उधमपूर आणि रियासी जिल्ह्यांमध्ये कमी गतीची मोबाइल इंटरनेट सेवा सुरू करण्यात आली होती.
जम्मू-काश्मीरमध्ये इंटरनेट सेवा सुरळीत करण्यात आल्यानंतर येथील पोलीस महानिरिक्षक मुकेश सिंह यांनी सोशल मीडियावर आक्षेपार्ह व वादग्रस्त मजकूर शेअर करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा दिला होता.
मात्र, तरीही काही लोकांनी सोशल मीडियावरून अफवा पसरवण्यास सुरुवात केली. दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील दोघांवर फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 केंद्र सरकारद्वारे हटवण्यात येण्याअगोदर तसेच जम्मू-काश्मीर आणि लडाखला केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्याची घोषणा करण्या अगोदर 4 ऑगस्ट रोजी येथील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती. शिवाय या निर्णया अगोदर राज्यात संचारबंदी देखील लागू करण्यात आली होती.