कोलकत्ता – भारतासारख्या विकसनशील देशामध्ये मोबाईल आणि इंटरनेटचा प्रसार वाढत असल्यामुळे मध्यमवर्गीय आणि श्रीमंताबरोबरच गरिबांचा विकास होण्यास मदत मिळत आहे असे मत नोबेल पुरस्कार विजेते अर्थतज्ञ मायकेल स्पेन्स यांनी व्यक्त केले.
राष्ट्रीय शेअर बाजार आणि न्यूयॉर्क विद्यापीठाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना स्पेन्स म्हणाले की, भारतामध्ये स्मार्टफोनचा वापर वाढत असल्यामुळे इंटरनेटचा वापर तळागाळापर्यंत वाढला आहे. त्याचा फायदा गरीब लोकांना होत आहे. इंटरनेटचा वापर वाढत असल्यामुळे भारतात मोबाईल आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात रोजगाराच्या बऱ्याच संधी निर्माण झाल्या आहेत.
भारतात विविध कारणामुळे मोबाईलचे दर कमी होत आहेत. त्याचबरोबर जागतिक दरापेक्षा भारतातील इंटरनेटचे दर कमी आहेत. त्यामुळे गरीब लोक इंटरनेट आधारित सेवांचा फायदा घेऊ लागले आहेत.
इंटरनेट आणि इतर डिजिटल व्यवस्थांचा वापर करून भारतात शैक्षणिक आणि आरोग्य क्षेत्रामध्ये सुधारणा करून वाटचाल करण्याची गरज आहे. केंद्र सरकारबरोबरच खाजगी क्षेत्र या क्षेत्रात बरीच गुंतवणूक करीत आहे. त्यामुळे भारतामध्ये डिजिटल व इंटरनेटचा विस्तार होण्याची शक्यता असल्याचे त्यांनी सांगितले.