राजगुरूनगर येथे पारितोषिक वितरण सोहळा
राजगुरूनगर (प्रतिनिधी) – मोबाइलमुळे माणसे मनकवडी झाली आहे. त्यामुळे त्यांचा विकास होत नाही. माणसातील एकमेकांमधील संवाद हरवले असून यामध्ये विद्यार्थीवर्ग मोठा असल्याने त्याचा करिअरवर मोठा परिणाम होत आहे. स्पर्धेच्या काळात टिकायचे असेल तर विद्यार्थ्यांनी मोबाइलचा अतिवापर टाळावा, असे आवाहन हुतात्मा राजगुरू शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष आमदार दिलीप मोहिते-पाटील यांनी राजगुरूनगर येथे केले.
येथील हुतात्मा राजगुरू शिक्षण प्रसारक मंडळ आयोजित सरसेनानी हंबीरराव मोहिते विधी महाविद्यालय, रत्नाई महाविद्यालय व कला वाणिज्य महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे उपकुलसचिव डॉ. प्रसाद कुलकर्णी, संस्थेच्या सुरेखा मोहिते पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष बबनराव डांगले, सचिव प्राचार्य डॉ. शिवाजीराव मोहिते, ऍड. सुभाष मोहिते, अरुण चांभारे, शांताराम देशमुख, कैलास सांडभोर, बार असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष कड, अरुण मुळूक, ऍड. पोपटराव तांबे, विनायक घुमटकर, दशरथ गाडे विधी महाविद्यालयाचे प्राचार्य किरण शिंदे, रत्नाई महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील पवार, डेहणे कला वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पांडुरंग मुळुक, प्रा. किशोर भागवत यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी, तिन्ही महाविद्यालयांचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक प्राचार्य किरण शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. स्वप्नील रणखांबे यांनी केले. आभार प्रा. निर्मला आडवळे यांनी
मानले.
मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा गौरव
यावेळी विविध विभागात प्रावीण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांना आमदार दिलीप मोहिते पाटील, जि. प. अध्यक्षा निर्मला पानसरे, उपकुलसचिव डॉ. प्रसाद कुलकर्णी यांच्या हस्ते बक्षिसे वितरण करण्यात आली. उल्लेखनीय काम करणाऱ्या प्राध्यापकांचाही सन्मान करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन देखील केले.