मुंबई : आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळ्याच पक्षांनी आतापासून प्रचार करण्यास सुरुवात केली आहे. ठाकरे गटाकडून राज्यात महाप्रबोधन यात्रा सुरू असून दुसरीकडे भाजपच्यावतीने मुंबईत ‘जागर मुंबई’चाअंतर्गत सभा घेण्याचे सत्र सुरू आहेत. दरम्यान आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनादेखील या सभेच्या स्पर्धेत उतरणार आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीत मनसे आपले संख्याबळ वाढवण्याच्या प्रयत्नात आहे. त्यासाठी मनसेच्यावतीने ‘घे भरारी’ सभेचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती समोर येत दिली. मनसेच्या स्थापनेनंतर झालेल्या 2012 मधील मुंबई महापालिका निवडणुकीत मनसेचे 27 नगरसेवक निवडून आले होते. त्यानंतर 2017 च्या मुंबई महापालिका निवडणुकीत 7 नगरसेवक निवडून आले होते. त्यातील सहा नगरसेवकांनी नंतर शिवसेनेत प्रवेश केला होता. विधानसभा निवडणुकीतही मनसेला प्रभावी कामगिरी करता आली नव्हती. त्यानंतर आता मनसेकडून आगामी मुंबई महापालिकेसह इतर महापालिका निवडणुकीची जय्यत तयारी सुरू करण्यात येत आहे.
मनसेकडून प्रत्येक विधानसभा मतदारसंघात ‘घे भरारी’ सभा आयोजित करण्यात येणार आहे. या सभांमध्ये पक्षाचे नेते, सरचिटणीस मार्गदर्शन करणार आहेत. आगामी निवडणुकीआधी पक्षाच्या कार्यकर्त्यांना सक्रीय करण्यासाठी आणि त्यांच्यात उत्साह वाढवण्यासाठी या सभांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. ‘घे भरारी’ संकल्पनेची लवकरच अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे. तसेच या अंतर्गत सभांचा कार्यक्रम जाहीर करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
मागील मुंबई महापालिका निवडणुकीत थोडक्यात हातातून सत्ता निसटली होती. त्यानंतर आता भाजपकडून यंदाच्या निवडणुकीत मुंबई काबीज करायची, असा चंग बांधला गेला आहे. भाजपकडून मुंबईत ‘जागर मुंबईचा’ या सभांचे आयोजन करण्यात येत असून शिवसेनेच्या नेतृत्वातील महापालिकेच्या कारभारावर टीका केली जात आहे.