मुंबई : राज्यात सत्तांतरानंतर शिंदे गट आणि शिवसेना यांच्यातील विरोध वाढतच असल्याचे दिसत आहे. त्यापाठोपाठ दोन्ही गटाकडून दरवर्षीप्रमाणे यंदाही दसरा मेळावा आमचाच होणार अशी भूमिका मांडली जात आहे. मात्र, या दोघांवर टीका करत मनसेकडून मात्र बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा वारसा महत्त्वाचा असल्याचे सांगितले जात आहे.
राज्यातील या वादावर मनसेकडून सातत्याने बाळासाहेबांचा विचार आमच्यासोबत असल्याचे सांगितले जात आहे. राज ठाकरेंनी काही दिवसांपूर्वी मनसेच्या कार्यकर्ता मेळाव्यात केलेल्या भाषणादरम्यान “माझ्याकडे चिन्ह असलं किंवा नसलं, नाव असलं किंवा नसलं, त्याने फरक पडत नाही. कारण बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा वारसा माझ्यासाठी जास्त महत्त्वाचा आहे”, असे म्हटले होते.
'शिवतीर्थ'वर होणारा दसरा मेळावा म्हणजे बाळासाहेबांच्या विचारांचे सोने लुटणे ! आजच्या घडीला दोनही गटांचे त्यावरून घमासान चालू आहे पण त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे "वारसा हा वास्तूचा नसतो, तर विचारांचा असतो" pic.twitter.com/bkTLZaEXMm
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) August 30, 2022
यानंतर आता मनसेकडून ही भूमिका सातत्याने मांडली जात आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आज सकाळी केलेल्या ट्वीटमध्ये याच मुद्द्यावरून शिवसेना आणि शिंदे गट यांना लक्ष्य केलं आहे. “‘शिवतीर्थ’वर होणारा दसरा मेळावा म्हणजे बाळासाहेबांच्या विचारांचे सोने लुटणे! आजच्या घडीला दोनही गटांचे त्यावरून घमासान चालू आहे. पण त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. वारसा हा वास्तूचा नसतो, तर विचारांचा असतो”, असं ट्वीट संदीप देशपांडे यांनी केलं आहे. मात्र, यासोबतच यंदाच्या दसरा मेळाव्याला राज ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंचे विचार जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी भाषण करावं, अशी विनंती आम्ही त्यांना करणार आहोत, अशी भूमिका संदीप देशपांडे यांनी मांडली आहे. या ट्वीटसोबत त्यांनी राज ठाकरेंचा एक फोटो शेअर करत त्यावर “वारसा हा वास्तूंचा नसतो, विचारांचा असतो” हे त्यांचे वाक्य देखील लिहिले आहे.