सातारा – छत्रपती शिवाजी महाराज यांचे वारस उदयनराजे भोसले यांना पहिल्या दोन वेळेपेक्षा अधिक मताधिक्य देऊन या वेऴी लोकसभेची हॅटट्रिक साधण्याचा ठाम निर्धार आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या येथे झालेल्या बैठकीत मनसैनिकांनी व्यक्त केला.
खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ उदयनराजे यांच्या उपस्थितीत ही बैठक घेण्यात आली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील, युवराज पवार, विकास पवार, उपाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड, राजेंद्र केंजळे, अश्विन गोळे, दादा शिंगण, सातारा शहराध्यक्ष राहूल पवार, माजी सभापती सुनील काटकर आदी यावेळी प्रमुख उपस्थित होते. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देश दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभा आहे. “खोटं बोल पण रेटून बोल’ हे सरकारचं धोरण जास्त दिवस चालणार नाही. त्यामुळे या निवडणूकीत परिवर्तन अटळ आहे.
लोकशाहीतील राजे असलेली जनताच सरकारला धडा शिकवेल, असा विश्वास उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केला. पेट्रोल, घरगुती गॅस सिलेंडरचे भाव 5 वर्षांत दुपटीने वाढले. देशाची हुकूमशाहीकडे वाटचाल सुरू आहे. हे रोखायचे असेल तर सत्ताधाऱ्यांना राज्यात रोखा, असे आवाहन रवी शेलार यांनी केले. यावेळी यांनीही मत मांडले. बैठकीस राजेंद्र बावळेकर, विकास पवार गोरख नारकर, अविनाश गोगावले, विश्वास सोनावणे आदी उपस्थित होते.