पाथर्डी (प्रतिनिधी) – करोना काळातील व्यापारी व घरगुती वीज ग्राहकांना वीज महामंडळाने दिलेली वाढीव वीज बिले कमी करून द्यावेत, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण परिवहन कामगार सेनेच्या वतीने वीज महामंडळाच्या कार्यालयात सुमारे दोन तास ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष अविनाश पालवे यांनी केले. येत्या दहा दिवसात ग्राहकांचा तक्रार निवारण मेळावा आयोजित करून सकारात्मक निर्णय घेण्याचे लेखी आश्वासन महावितरणचे उपकार्यकारी अभियंता निलेश मोरे यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
करोनाकाळात घरगुती व व्यापारी ग्राहकांना अवास्तव वीज बिले पाठवण्यात आल्याची तक्रार करुन वाढीव वीज बिल कमी करण्याची मागणी मनसेच्या वतीने वीज महामंडळाकडे करण्यात आली. यावेळी अविनाश पालवे म्हणाले, चार- पाच महिने लॉकडाऊन असल्याने बाजारपेठ बंद होती, दुकाने बंद होती मग वाढीव बिले दिलीच कशी? तसेच घरगुती ग्राहकांना देखील नेहमीपेक्षा वाढीव बिले महावितरणकडून देण्यात आली आहेत. लॉकडाऊन काळामध्ये रीडिंग न घेताच अंदाजे वीज बिले दिल्याने हा प्रकार घडला आहे.
तरी येत्या पंधरा दिवसात पाथर्डी शहर व तालुक्यातील ग्राहकांना त्यांची वीज बिले कमी करून द्या. जोपर्यंत ठोस आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत आम्ही हलणार नाही, अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली. महावितरणचे उपकार्यकारी अभियंता निलेश मोरे यांनी येत्या दहा दिवसात ग्राहक तक्रार निवारण मेळावा घेऊन ग्राहकांची वाढीव वीज बिले कमी करून देऊ असे लेखी आश्वासन दिल्यावर आंदोलन स्थगित करण्यात आले. यावेळी मनसे तालुकाध्यक्ष संतोष जिरेसांळ, मनसे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष प्रवीण शिरसाठ, शहर सचिव संदीप काकडे, मनसे विद्यार्थी सेना शहराध्यक्ष जयंत बाबर, पप्पू शिरसाट, कैलास पालवे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.