पुणे – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये गेल्या दोन दिवसांपासून मोठी उलथापालथ बघायला मिळत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशावरच आक्षेप घेणाऱ्या मनसे शहराध्यक्ष वसंत मोरे यांची काल शुक्रवारी पुणे शहराध्यक्षपदावरून हकालपट्टी करण्यात आली व शहराध्यक्षपदी मोरे यांचे खंदे समर्थक आणि महापालिकेतील गटनेते साईनाथ बाबर यांच्याकडे शहराध्यक्षदाची जबाबदारी देण्यात आली आहे. दरम्यान वसंत मोरे यांचे काय चुकले असा सवाल करत पक्षाचे शहर उपाध्यक्ष अझरुद्दीन सय्यद यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा पुण्यात मनसेला धक्का बसला आहे.
गुढीपाडव्याच्या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे उतरले नाहीत तर मनसेच्या कार्यकर्त्यांनी त्याला प्रत्युत्तर म्हणून हनुमान चालीसा भोंगाव्यावर लावाव्यात, असे आदेश दिले होते. मात्र ठाकरे यांची भूमीका न मानण्याचा निर्णय घेतल्याने मोरे यांना पदावरुन हटवून त्यांच्या जागी नगरसेवक साईनाथ बाबर यांची अध्यक्षपदावर नियुक्ती करण्यात आली. त्यामुळे मोरे समर्थकांमध्ये नाराजीची भावना आहे.
अझरुद्दीन सय्यद यांनी आपल्या पदचा राजीनामा मनसेचे नवनियुक्त शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्याकडे सादर केला आहे. आपल्या राजीनाम्यात सय्यद यांनी नाराजी व्यक्त करत मनसेवर टीका सुद्धा केली आहे. त्यामध्ये मी अत्यंत दुःखी आणि निराश मनाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आज शेवटचा ‘जय महाराष्ट्र’ करत आहे. मी ज्या समाजातून येतो त्या समाजाबद्दल चुकीची भूमीका घेऊन त्याच पक्षाच्या पक्षाध्यक्षांनी मला पक्ष सोडायला भाग पाडले त्या पक्षाध्यक्षांचे आभार.
सय्यद प्रश्न उपस्थित करत म्हणाले की, वसंत मोरेंचे काय चुकले असा सवालही सय्यद यांनी या पत्रात उपस्थित केला आहे. त्यांनी फक्त लोकप्रतिनिधी म्हणून जी भावना व्यक्त केली तरी त्यांना काय वागणूक मिळाली हे आज उभ्या महाराष्ट्राने पाहिले. त्यांना ही वागणूक मिळाली तिथे इतर लोकांचे काय? पक्ष स्थापन झाल्यापासून आत्ताच जर पाडव्याच्या दिवशी मशिदीच्या भोंग्यांचा आणि मदरशाचा त्रास होत असेल तर नक्कीच काहीतरी चुकीचे होते आहे असेही ते म्हणाले आहेत.