मुंबई – आगामी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी कार्यकर्ते आग्रही आहेत. पण यावर अंतिम निर्णय राज ठाकरे हे घेणार असल्याची माहिती, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते बाळा नांदगावकर यांनी मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
विभाग अध्यक्ष आणि उपाध्यक्षांचा अहवाल तयार केला असून तो आम्ही आता राज ठाकरेंना देणार आहोत. कार्यकर्त्यांनी निवडणूक लढवली पाहिजे अशी भूमिका मांडलेली आहे. पण याबाबतचा अंतिम निर्णय हा राज ठाकरेंचा आहे. तेही याचा सकारात्मक विचार करतील, असे नांदगावकर यांनी स्पष्ट केले.
निवडणूक लढवायचे झाल्यास ती एकट्याने की आघाडी करुन त्याचाही अद्याप विचार केलेला नाही. आतापर्यंत आमची भूमिका ही ‘एकला चलो रे’ अशीच होती. फक्त गेल्या लोकसभा निवडणुकीत आम्ही एका पक्षाला पाठिंबा दिला होता. अमित ठाकरे यांच्याबाबत प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, अमित हे पक्षाच्या प्रत्येक बैठकीला उपस्थित असतात. ते पक्षाच्या खालच्या फळीत काम करत आहेत, ही चांगली गोष्ट आहे, असेही ते म्हणाले.