मुंबई : वांद्रे येथील एमआयजी येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे सोमवारी (दि.30) मनसेच्या इच्छुकांचा मेळावा घेणार आहेत. यावेळी राज ठाकरे सर्व इच्छुक उमेदवारांसोबत साधणार संवाद आहेत. या मेळाव्यात राज ठाकरे विधानसभा निवडणुकीची रूपरेषा ठरवणार आहेत.
इव्हीएम मशीन जो पर्यंत आहेत तोपर्यंत निवडणूक लढवू नये, असे राजठाकरे यांचे मत होते. पण निवडणूक न लढल्यास पक्षाच्या वाढीला मर्यादा येतील असे काही पदाधिकाऱ्यांचे मत होते. त्यामुळे ही निवडणूक लढण्यास राज ठाकरे राजी झाले आहेत. त्यामुळे काही निवडक मतदार संघात उमेदवार उभे करून त्यांच्यामागे पक्षाची ताकद उभी करण्याचे धोरण मनसेने ठरवले असल्याचे काही सुत्रांनी सांगितले. यात मनसेने पुण्यातील तीन जागांवर आपले लक्ष केंद्रीत केले आहे.
गेल्या काही वर्षात भाजपा आणि शिवसेनेन पळविलेल्या आमदारांच्या विरोधात मनसे दंड थोपटून उभे राहणार असल्याची माहितीही हाती येत आहे. 2014 च्या निवडणुकीत जिथे मनसेचा उमेदवार कॉंग्रेस किंवा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवारामुळे थोड्या फरकाने पराभूत झाला अशा काही जागांवर आघाडीने उमेदवार न देता मनसेला मदत करावी,अशी अपेक्षा मनसेकडून व्यक्त होत आहे.