मुंबई – कोकणातील राजापूरमधील बारसू येथील प्रस्तावित रिफायनरीवरून वाद निर्माण झाला आहे. आता यावरून राजकारण देखील चांगलाच तापायला सुरुवात झाली आहे. महाविकास आघाडी आणि शिंदे गटासह भाजपकडून आरोप प्रत्यारोप सुरु असताना आता मनसेने याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल असे प्रकल्प कोकणात यायला पहिले अशी प्रतिक्रिया मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी मध्यमसनही बोलताना दिली.
मुंबईत माध्यमांशी बोलताना सरदेसाई यांनी याबाबतची आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले,”कोकणातील अनेक तरुण तरुणी रोजगारासाठी मुंबईत येतात. कोकणात रोजगाराच्या संधी खूपच कमी आहेत. त्यामुळे कोकणात पर्यटनासोबत येथे पिकणाऱ्या काजू,आंब्यासारख्या पिकांवर प्रक्रिया करणारे प्रकल्प कोकणात आले पाहिजेत त्यामुळॆ रोजगार निर्माण होईल”
अशा प्रकल्पांमुळे रोजगार निर्मिती जरी होत असली तरी स्थानिकांना पूर्णपणे विश्वासात घेऊनच प्रकल्प आणले पाहिजेत हीच आमची भूमिका असल्याचे देखील यावेळी सरदेसाई यांनी स्पष्ट केले. तसेच येत्या ६ मी रोजी राज ठाकरे यांची रत्नागिरीमध्ये सभा होणार असून यावेळी ते यावर आपली भूमिका मांडतील असं देखील सरदेसाई यावेळी म्हणाले.
मंगळवारी या प्रकल्पाबाबत माती परीक्षणासाठी असलेला स्थानिकांचा विरोध पोलीस बळाचा वापर करून मोडून काढला. यावेळी शेकडो आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यानंतर याचे पडसाद राजकीय वर्तुळात देखील उमटू लागल्याचे पाहायला मिळाले होते.