नागपूर : राज्यात विधानसभा निवडणूकीनंतर नाटयमय घडामोडी घडत सत्ता स्थापन झाल्यानंतर पुन्हा एकदा नवी समीकरणे तयार होण्याची शक्यता आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर भाजप-मनसेच्या युतीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे माजी प्रवक्ते मा. गो. वैद्य यांनी मोठे विधान केले आहे.
जर मनसेला संघांचे हिंदूत्व मान्य असेल. तर ते भाजपसोबत येतील, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. मा. गो. वैद्य म्हणाले, मनसेला संघाचे हिंदूत्व मान्य असेल, तर ते भाजपसोबत येईल. मनसे आणि भाजप यांच्या विचारांपेक्षाही ते त्या व्यक्तिंवर अवलंबून आहे. कारण जर त्यांना भाजपची भूमिका स्विकृत असेल, व्यापक हिंदूत्वाची संघाची भूमिका मान्य असेल तर मनसे भाजपसोबत येईल, असे त्यांनी सांगितले.
तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारसोबतच सर्वच राज्यांना सुधारित नागरिकत्व कायदा लागू करावा लागेल असेही त्यांनी सांगितले. राज्याची पूनर्रचना आवश्यक आहे. ज्यात विदर्भ वेगळा होईल. कोणत्या राज्याची लोकसंख्या ही 3 कोटींच्यावर नको आणि एक कोटींपेक्षा कमी नको. हे यापूर्वी अनेकांनी सांगितले.
म्हणूनच गोवा महाराष्ट्रापासून वेगळे आहे. जर महाराष्ट्राची 11 कोटी किंवा त्यापेक्षा जास्त लोकसंख्या असेल, तर राज्याचे 3 किंवा चार भाग होतील. तसेच छोट्या राज्यासाठी केंद्र सरकारने प्रांत रचना आयोग नेमावा, अशीही मागणी त्यांनी केली आहे.
मनसेचे महाअधिवेशन
शिवसेनेने भाजपची साथ सोडल्याने, मनसे आणि भाजपची युती होण्याची शक्यता वर्तवली जात होती. गेल्या काही दिवसांपासून तशा चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात सुरु आहेत. येत्या 23 जानेवारीला मनसेचे महाअधिवेशन होणार आहे. मनसेच्या कारकिर्दीतील हे पहिले अधिवेशन आहे. या अधिवेशनात राज ठाकरे कोणती भूमिका जाहीर करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.