वडगाव मावळ (प्रतिनिधी) – मावळ तालुक्यात महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सुरू असलेल्या अनेक कामांना केंद्र शासनाकडून वेळेवर निधी उपलब्ध होत नसल्याने अनेक कामे अर्धवट अवस्थेत रखडली आहेत. निधी मिळविण्यासाठी या योजनेतील लाभार्थी वारंवार पंचायत समिती कार्यालयात हेलपाटे मारून त्रस्त झाले आहेत.
मावळ तालुक्यात मानरेगा अंतर्गत सध्या जनावरांसाठी गोठा बांधणे – 32, विहीर बांधणे – 6, गोदाम बांधणे – 1, मातोश्री पंधण रस्ता – 1, घरकुल 68, रेशीम उद्योग -9 , शोष खड्डे 200, एवढ्या कामांना शासनाकडून मंजूरी देण्यात आली आहे. सुरवतीच्या टप्प्यात या कामांना निधी उपलब्ध करून देण्यात आल्याने या कामांना सुरवात झाली. मात्र नंतर या कामांना वेळेवर निधी उपलब्ध होत नसल्याने ही कामे अर्धवट अवस्थेत रखडली आहेत.
सुरवातीच्या टप्प्यात या कामांना अकुशल फंड उपलब्ध करून दिला होता. आता ही कामे अंतिम टप्प्यात पोचल्यावर या कामांसाठी आवश्यक असणारा कुशल फंड उपलब्ध होत नसल्याने कामे थांबली आहेत. तसेच जून महिन्यापासून या योजेतंर्गत काम करणाऱ्या मजुरांना देखील पैसे उपलब्ध झालेले नाहीत. निधी मिळवण्यासाठी नागरिक वारंवार पंचायत समितीच्या कार्यालयात हेलपाटे मारून देखील निधी उपलब्ध होत नसल्याने या योजनेतील लाभार्थी त्रस्त झाले आहेत.
मनरेगा योजने अंतर्गत तालुक्यात सुमारे 200 शोष खड्डे पावसाळ्यापूर्वीच खोदून तयार झाले होते. मात्र त्यामध्ये बसविण्यासाठी लागणाऱ्या प्लॅस्टिक टाक्या अद्याप पर्यंत उपलब्ध न झाल्याने आता पुन्हा या खड्डयांमध्ये माती साचल्याने मजुरांना पुन्हा खड्डे घेण्याचे काम वाढणार आहे.
मनरेगा अंतर्गत गावात गोदाम बांधण्याचा राज्यातील पहिलाच नाविन्यपूर्ण उपक्रम मावळातील आढे गावात राबविण्यात आला होता. राज्यातील पहिलेच काम असल्याने या कामाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते पार पडले होते. मात्र या कामासाठीदेखील निधी उपलब्ध झालेला नाही. तसेच रेशीम उद्योग, मातोश्री पांदन रस्ते यांची देखील हीच अवस्था झाली आहे.
निधी मागणीचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविण्यात आला आहे. तसेच ऑनलाईन प्रणालीत देखील वारंवार बदल होत असल्याने नागरिकांना मजुरी अदा करण्यात अडचणी निर्माण होत आहेत.
-विकास गजभिव, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी मनरेगा