नगर: केंद्र सरकारने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची कार्यपद्धती पेपरलेस करण्यावर भर देण्यात आला आहे. त्यानुसार राज्यात यंदापासून या कार्यपद्धतीचा अवलंब केला जाणार आहे. त्यामुळे या योजनेतील पैसे थेट लाभार्थ्याच्या खात्यावर जमा होणार आहेत.
या वर्षापासून रोजगारासाठी ग्रामीण दरांचा वापर करून अंदाजपत्रक गणना हे खास सॉफ्टवेअर विकसित करण्यात आले आहे. त्यामुळे कामाचे अंदाजपत्रक बदलत जाणाऱ्या दरसूचीनुसार तयार होणार आहे. विभागप्रमुखांना अंदाजपत्रकाला ऑनलाईन मंजुरी द्यावी लागेल. मजुरांची नोंद ऑनलाईन केल्यानंतर वेतन ऑनलाईनद्वारे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होत आहे. कामांची मोजमापे टाकल्यानंतर लगेच बदलत्या दरसूचीनुसार कामांच्या खर्चाचे अंदाजपत्रक तयार होईल.
अशी असणार रचना
“मनरेगा’च्या कामाचे मुख्य घटक असलेल्या गटविकास अधिकारी, तांत्रिक साहाय्यक, उपअभियंता/कृषी अधिकारी यांचे ऑनलाइन लॉगीन करण्यात आले आहे. यानुसार तांत्रिक साहाय्यकाने अंदाजपत्रक बनवून ते लॉगीनमध्ये सेव्ह करायचे आहे. त्यानंतर गटविकास अधिकाऱ्यांनी प्रशासकीय मान्यता देतील, त्यानंतर उपअभियंता/कृषी अधिकारी मान्यता देतील.