जयपूर – राजस्थानमध्ये मनरेगातून तब्बल 49 लाख नागरिकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. यामध्ये गतवर्षीच्या तुलनेत सुमारे 17 लाखांनी वाढ झाली आहे. यावरून लॉकडाउनमध्ये स्वगृही परतल्यांसह रोजगार गमविलेल्या स्थानिकांसाठी मनरेगा वरदान ठरत असल्याचे दिसून येत आहे.
राजस्थानचे मनरेगा आयुक्त पी. सी. किशन म्हणाले, केवळ स्थलांतरी कामगारच नव्हे तर स्थानिक लोकांनाही या योजनेचा फायदा झाला आहे.
राज्यातील एकूण एकूण 11,346 पंचायतीपैकी 9 हजार 983 ग्रामपंचायतींमध्ये महात्मा गांधी रोजगार हमी कायद्यांतर्गत 49 लाख 52 हजार 496 लोकांच्या हाताला काम मिळाले आहे. गतवर्षी 6 जून रोजी ही आकडेवारी 32 लाख 25 हजार 931 ऐवढी होती. जी या वर्षीच्या आकडेवारीपेक्षा 17 लाख 26 हजार 565ने कमी आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
किशन म्हणाले की, राजस्थानमधील उदयपूर जिल्ह्यातून 2,65,153, तर डूंगरपुरात 3,33,078 कामगारांना रोजगार मिळाला, जो मागील वर्षी 2,24,678 इतका होता. या योजनेंतर्गत काम करणाऱ्या कामगारांची संख्या राज्यातील सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये तुलनेने जास्त आहे. जिथे बहुतांश लोक इतर राज्यातून परतले आहेत. यावरून स्थलांतरीत मजुरांसाठी ही योजना फलदायी ठरली आहे.
दरम्यान, राजस्थाननंतर दुस-या क्रमांकावर उत्तर प्रदेशातील 41 लाख कामगारांना रोजगार मिळाला आहे. त्यापाठोपाठ आंध्र प्रदेशातील 40 लाख नागरिकांना या योजनेंतर्गत रोजगार उपलब्ध झाला आहे. त्यानंतर छत्तीसगड आणि मध्य प्रदेश यांनी अनुक्रमे 25 लाख आणि 24 लाख लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला.