एमआयडीसीतील कंपनी प्रतिनिधींसोबत आमदार सुनील शेळके यांनी संवाद साधला
तळेगाव दाभाडे (वार्ताहर) – मावळ तालुक्यातील औद्योगिक क्षेत्रातील प्रतिनिधीसोबत आमदार सुनील शेळके यांनी सुसंवाद साधला.तालुक्यातील सर्व कंपन्यांच्या प्रतिनिधींची उपस्थिती होते.
औद्योगिक क्षेत्राची सामाजिक बांधिलकी म्हणून दिलेले योगदान मावळ तालुक्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरू शकेल. औद्योगिक क्षेत्रातील प्रतिनिधींनी मावळच्या जनतेच्या सर्वसमावेशक विकासासाठी सहभागी होऊन नाविन्यपूर्ण, प्रभावीपणे काम करावे, असे आवाहन शेळके यांनी केले. प्रतिनिधींनी मनोगत व्यक्त करताना त्यांना येणाऱ्या समस्या मांडल्या. दळणवळण, वीज अनियमितता, पाणीटंचाई हे प्रमुख प्रश्न प्रामुख्याने भेडसावत आहेत. तळेगाव एमआयडीसीमध्ये ट्रक टर्मिनल, औद्योगिक क्षेत्रासाठी अद्ययावत फायर ब्रिगेड होणे गरजेचे आहे, अशा अनेक समस्या औद्योगिक क्षेत्रात आहेत.
त्यानंतर आमदार शेळके म्हणाले की, तुम्ही जसे एखाद्या कंपनीचे कर्मचारी आहात, तसा मी पण या जनतेचा कर्मचारी आहे. स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार मिळाला पाहिजे, कौशल्य विकासातून महिलांचे स्वावलंबीकरण झाले पाहिजे. ज्या ठिकाणी महिलांना आर्थिक उत्पन्नाच्या संधी मर्यादित आहे, जिथे मुलांच्या शिक्षणासाठी अडचणी येत आहेत, अशा ठिकाणी आपण सर्वांनी हातभार लावणे गरजेचे आहे.
मावळ तालुक्यातील औद्योगिक क्षेत्रात नवीन कंपन्यांची गुंतवणूक कशी वाढेल, तसेच कारखानदारांना मिळणाऱ्या मुलभूत सुविधा देण्यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील राहणार आहे. तालुक्याच्या विकासासाठी कंपन्यांकडून भरीव योगदान देणे गरजेचे आहे, सीएसआर निधी अंतर्गत सर्वांगीण विकास होणे आवश्यक आहे. मुलभूत सुविधांसाठी सीआरएस वापर व्हावा. सीएसआरच्या माध्यमातून शक्य ती मदत सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवणे हे आपले उद्दिष्ट असले पाहिजे. असे आवाहन आमदार शेळके यांनी केले.