मुंबई – राज्यात काँग्रेसची अवस्था मागील दोन निवडणुकीत बिकट झाली आहे. मात्र महाविकास आघाडी निर्माण झाल्याने काँग्रेसला सत्तेत सहभागी होऊन पक्ष संघटन मजबूत करण्याची संधी मिळाली आहे. मात्र काँग्रेसमधील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आले आहेत. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्याविरुद्ध काँग्रेस आमदार झिशान सिद्दिकी यांनी पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केली आहे.
आमदार झिशान सिद्दिकी यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांना पत्र लिहून मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आणि आमदार भाई जगताप यांच्याविरोधात आरोप केले आहेत. पक्षाचा अध्यक्ष माझ्याविरोधात कारवाई करत असल्याचा गंभीर आरोप सिद्दिकी यांनी भाई जगताप यांच्यावर केला आहे.
काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप यांनी मुंबईतील निवडणूकीत झिशान सिद्दिकीला मदत केली तर पक्षात पद देणार नाही असे पक्षातील पदाधिकारी आणि नगरसेवक यांना बाजवले होते. माझ्यासोबत काम करणाऱ्यांना बजावले जात आहे आणि माझ्याविरोधात काम करणाऱ्यांना ताकद दिली जात असल्याचा आरोप काँग्रेस आमदार झिशान सिद्दिकी यांनी केला आहे.
या व्यतिरिक्त मुंबई काँग्रेस मार्फत वांद्रे येथे टूलकिट वाटप करण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. मात्र वांद्रेचा स्थानिक आमदार असून आपल्याला आमंत्रित केलं नव्हतं. प्रोटकॉलचा हा भंह असल्याचं सिद्दिकी यांनी म्हटलं आहे.