प्रभात वृत्तसेवा पुणे : राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धेच्या दरम्यान भू-संपादनासाठी आपली घरे तत्काळ खाली करणाऱ्या विमाननगर येथील सिद्धार्थनगर मधील नागरिकांची पुणे महापालिका व झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडून टोलवाटोलवी केली जात आहे. या लोकांना घरे कधी दिली जाणार? असा प्रश्न वडगावशेरी मतदार संघाचे आमदार सुनील टिंगरे यांनी गुरुवारी विधानसभेत उपस्थित केला.
2008-09 च्या दरम्यान पुणे शहरात राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या दरम्यान शहरात मोठ्या प्रमाणावर मुलभूत सुविधा उपलब्ध करण्यात आल्या. त्यामध्ये रस्ते, क्रीडांगण व क्रीडा संकुल यांचा समावेश आहे. यामध्ये लोहगाव एयरपोर्ट से नगररोड दरम्यानच्या रस्त्याचे रूंदीकरण करण्यात आले. यावेळी पुणे मनपाचे आयुक्त म्हणून प्रविणसिंह परदेशी कार्यरत होते. परदेशी यांच्याकडे झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाची जवाबदारी देखील होती.
विमाननगर येथील सिद्धार्थनगर मधील काही घरे रस्ता रूंदीकरणात बाधा आणत होती. त्यांचे पुनर्वसन करण्याचे आश्वासन देवून तेथील 138 घरे व दुकानांची जागा संपादित केली गेली. नागरिकांनी देखील राष्ट्रकुल स्पर्धेसाठी लगेचच आपल्या घरांचा ताबा दिला. त्यानंतर आता 14 वर्षे झाल्यावरण सुद्धा नागरिकांचे पुनर्वसन करण्यात आले नाही.घरांसाठी नागरिक मनपा आणि झोपडपट्टी पुनवर्सन प्राधिकरण दोन्हीकडे हेलपाटे मारत आहेत, परंतु दोघांकडून एक-दूसऱ्याकडे बोटे दाखविली जात असल्याचे सांगत तातडीनं घरे उपलब्ध करून देण्याची मागणी टिंगरे यांनी केली.