मुंबई – औरंगाबादचे नाव “छत्रपती संभाजीनगर’ व उस्मानाबादचे “धाराशिव’ करण्याच्या राज्य सरकारच्या प्रस्तावाला शुक्रवारी केंद्राने मंजुरी दिली आहे. त्यानुसार, कित्येक दिवसांपासून प्रलंबित असणाऱ्या या दोन जिल्हांच्या नामांतरावर अखेर केंद्राकडूूनही शिक्कामोर्तब करण्यात आले. यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्र सरकारला धन्यवाद दिले आहेत. तर उद्धव ठाकरे गटाने याचे श्रेय स्वःताह घेत भाजपसह शिंदे गटावर टीका केली आहे. यावर औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचे खासदार इम्तियाज जलील यांनी औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतरावरून पुन्हा एकदा विरोध दर्शविला आहे.
इम्तियाज जलील यांनी संताप व्यक्त करत टीका केली आहे की,’महापुरुषांचे नाव घेऊन आम्ही कधीही राजकारण केलं नाही. हे लोक आपल्या राजकीय स्वार्थासाठी असं करत आले आहेत. आम्ही नावाचा विरोध केलेल आहे, करत राहणार आहे. कारण, जेव्हा सरकार म्हणून चांगलं काही केलं आहे हे दाखवण्यासाठी तुमच्याकडे काही नसतं, तर मग अशाप्रकारचे मुद्दे ते वारंवार पुढे आणतात.’
यावर आता शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी खासदार जलील यांना प्रत्युत्तर दिलं आहे. शिवसेना आमदार संजय शिरसाट म्हणाले,’ आमच्याकडे आणखी काही मुघल, निजाम बाकी आहेत आणि त्यांना हे नाव आवडणार नाही. त्यांचं म्हणणं त्यांच्या पद्धतीने ठीक आहे. त्यांना राजकारण त्यांच्या पद्धतीने करायचं आहे. ज्या औरंगजेबाने आमच्या संभाजी महाराजांचे हाल केले. त्या औरंगजेबाचं नाव काढून संभाजी महाराजांचं नाव शहराला देताना यांना का त्रास होतो? तुम्ही औरंगजेबाच्या थडग्यावर जाऊन माथा टेकवतात. आम्ही तुम्हाला विरोध नाही केला.’
माध्यमांशी बोलतांना ते पुढे म्हणाले,’ तुम्ही तुमचं राजकारण करा. परंतु औरंगजेबाबद्दल एवढा तुम्हाला पुळका असण्याचं कारण काय? मग आपल्या मुलांची नावं औरंगजेब ठेवा. राजकारण हे प्रत्येक गोष्टीत नसतं. महापुरुषांचा अभिमान जागृत ठेवण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहोत, तर आमचं काय चुकलं? आम्ही दिलेल्या नावाला तुमचा विरोध असण्याचं कारण काय? त्यांना त्यांचं राजकारण करायचं आहे, त्यांना त्यांची मुघलशाही, निजामशाही, औरंगाबाद, निजामाबाद, उस्मानाबाद ही त्यांची ओळख आम्हाला कशाला पाहिजे.” असं म्हणत त्यांनी प्रतिउत्तर दिले आहे.