मुंबई – राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचा विषय आता गंभीर बनत चालला असून सत्तारूढ शिंदे गटाच्या एका आमदारानेच आज राज्यपालांना महाराष्ट्रातून हटवण्याची मागणी केली आहे. संजय गायकवाड असे या आमदाराचे नाव आहे. त्यांनी म्हटले आहे की, राज्यपालांना हे समजले पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराज कधी जुने होत नाहीत आणि त्यांची तुलना अन्य कोणाही व्यक्तीशी केली जाऊ शकत नाही.
ज्यांना इतिहासच माहिती नाही अशा व्यक्तीला महाराष्ट्रात राज्यपाल पदावर ठेवण्याची गरज नाही. त्यामुळे केंद्र सरकारने त्यांना अन्यत्र कुठेतरी हलवले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. संजय गायकवाड हे बुलढाणा जिल्ह्यातील शिंदे गटाचे आमदार आहेत. हा गट सध्या राज्यात भाजपबरोबर सत्तेत आहे. त्यांनीच अशी मागणी केल्याने त्याला विशेष महत्त्व दिले जात आहे.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर राष्ट्रवादी पक्षाने मोठया प्रमाणात विरोध दर्शवला आहे. त्याचबरोबर छत्रपती संभाजीराजे यांनीही राज्यपालांना महाराष्ट्रातून हटवा, असे म्हटले होते. राज्यपाल कोश्यारी याअगोदरही महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे अडचणीत सापडले होते. त्यामुळे आता जर राज्यपालांना महाराष्ट्राचा इतिहास माहिती नसेल, तर त्यांची महाराष्ट्रातून तातडीने बदली करावी, अशी मागणी केली जात आहे.